ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांची एक सही नसल्यानं प्रवाशांचे होणार हाल; 'लालपरी'च्या नवीन गाड्यांना विलंब - ST Corporation bus procurement

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 8:20 PM IST

Updated : Apr 25, 2024, 9:28 PM IST

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde BT Bus : एसटी महामंडळाच्या नवीन बस खरेदी निधीच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी न केल्यानं 2 हजार 200 बसेस रखडल्या आहेत. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. वेळेवर फाईल पाठवूनही स्वाक्षरी न होण्यामागे काही आर्थिक गणित आहे का? अशी शंका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं व्यक्त केली.

मुंबई Eknath Shinde ST Bus : राज्यातील जनतेला एसटी महामंडळाच्या जुन्या तसंच नादुरूस्त गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळं राज्य सरकारनं नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बसेस खरेदी करणाऱ्या निधीच्या फाईलवर सही केली नसल्यानं एसटीला मिळणाऱ्या 2 हजार 200 गाड्या रखडल्या आहेत, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. सरकारच्या बहुतेक सह्या या 'चंदा दो, धंदा लो' या तत्वानुसार होत असतात, तसाच तर हा प्रकार नाही ना? अशी शंकाही श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

अनेक गाड्या मोडकळीस : एसटी महामंडळाच्या जवळपास 10 हजार बस गाड्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांचं दुरुस्तीचे काम करून यांत्रिकी कर्मचारी हैराण झाले आहेत. तसंच या गाड्या रस्त्यावर चालवताना चालकांना त्रास होतोय. त्यामुळं महामंडळानं अशोक लेलँड कंपनीकडून बॉडी बांधणीसह तयार 2 हजार 200 बसेसची निविदा मंजूर केली. मात्र, त्यासाठी लागणारा निधी सरकारकडून त्यांना मिळालेला नाही. निधी दिल्याशिवाय महामंडळ वर्कऑर्डर देऊ शकत नाही, असं महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितलं. सरकारकडून बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेला निधी कधीच वेळेवर मिळत नाही. त्यामुळं विनाकारण पुरवठादार, महामंडळ यांच्यात संघर्ष उभा राहतो, असं देखील त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांकडं फाईल पडून : 2 हजार 200 बस गाड्यांच्या खरेदी प्रकरणात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडं फाईल स्वाक्षरीसाठी पाठवली होती. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. या फाईलवर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोपही बरगे यांनी केला.

महामंडळाला निधी प्राप्त करून द्यावा : यंदा उन्हाळी हंगामात गाड्या कमी पडणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना त्याचा त्रास होणार आहे. तसंच जुन्या गाड्या चालविण्याचा त्रास चालकांना होणार असून त्या दुरुस्ती करण्याचा त्रास यांत्रिकी कर्मचाऱ्यानाही होणार असल्याचं बरगे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या बेफिकीरीमुळं फाईल धूळखात पडून आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर तीन महिन्यांनी गाड्या यायला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत शाळा, कॉलेजच्या सुट्ट्या, जत्रा हंगाम संपणार आहे. त्यामुळं या हंगामात महामंडळाचं कोट्यवधी रूपयांचं उत्पन्न बुडणार आहे. तत्काळ यातून योग्य मार्ग काढून प्रसंगी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन तिढा सोडवण्यासाठी महामंडळाला निधी प्राप्त करून द्यावा, अशी मागणीही बरगे यांनी केली.

प्रक्रिया लांबल्यानं गाड्या येण्यास उशीर : या संदर्भात बोलताना एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले म्हणाले की, "गाड्या येण्यास विलंब होत आहे. मात्र, याला केवळ महामंडळाचे अध्यक्ष म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत, असं म्हणता येणार नाही. याबाबतची प्रक्रिया थोडी वेळ घेणारी आहे. विविध स्तरांवरून याबाबतची फाईल पुढं जाते. नंतर ती मुख्यमंत्र्यांकडं स्वाक्षरीसाठी पाठवली जाते. आचारसंहितेमुळं मुख्यमंत्री कार्यालयाकडून विलंब होण्याची शक्यता आहे. परंतु, गाड्या खरेदीची पहिली निविदा प्रक्रिया रद्द करून दुसरी निविदा प्रक्रिया राबवावी लागली. त्यानंतर एक गाडी बांधून महामंडळाला दाखवून त्याची मंजुरी द्यावी लागली. त्यानंतर ही प्रक्रिया राबवावी लागल्यानं विलंब होत आहे."

हे वाचलंत का :

  1. उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांचा छगन भुजबळांना आला होता फोन; पण.... - Lok Sabha election 2024
  2. अमरावतीला फसवणूक नको विकास पाहिजे, विरोधकांची टीका; तर खासदारांनी शेकडो कोटींचा विकास केला, सत्ताधाऱ्यांचा दावा - Amravati Lok Sabha Constituency
  3. आता लगबग मतदानाची: यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान - Lok Sabha Election 2024
Last Updated :Apr 25, 2024, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.