ETV Bharat / state

"शरद पवार म्हणतात मला"; दमदाटी करणाऱ्या आमदाराला भरला सज्जड दम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 1:58 PM IST

Updated : Mar 7, 2024, 5:07 PM IST

Sharad Pawar : शरद पवार यांनी 50 वर्षात काय केलं? असा प्रश्न विचारत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून टीका केली होती. याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Sharad Pawar News
Sharad Pawar News

लोणावळा(पुणे) Sharad Pawar : शरद पवार गटानं लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार यांनी मावळमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसंच मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या दमदाटीवरुनही पवार यांनी इशारा दिलाय.

शरद पवारांचं जंगी स्वागत : लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवून व क्रेनच्या सहाय्यानं हार घालून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. तसेच जेसीबीद्वारे त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान, अजित पवार गटातील लोणावळ्यातील १०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय.

केंद्र आणि राज्य सरकारवर टीका : शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. शरद पवार म्हणाले, "देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होतोय. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचनं आठवं समन्स धाडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्यानंतर भाजपाची आता दिल्लीवर नजर आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात अडकवलं होतं. कारण राऊत हे 'सामना'तून भाजपावर टीका करतात. म्हणजे या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही."

सुनील शेळकेंची दमदाटी? : शरद पवार पुढं म्हणाले, "मी इथं आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदारानं (मावळचे आमदार सुनील शेळके) बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते."

शरद पवारांचा इशारा : सुनील शेळकेंना इशारा देत शरद पवार म्हणाले, इथले जे आमदार दमदाटी करत आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळं झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथं कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीनं तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्यानं कधी जात नाही. परंतु, या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही."

पंतप्रधानांवर टीका : शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी असल्याची टीका केली. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यावर मी म्हणालो, हिंमत असेल तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे. पंतप्रधान मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय? ज्यांच्यावर आरोप केले, आज ते भाजपामध्ये आहेत. त्यामुळं भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा. भाजपात गेल्यानंतर १५ व्या दिवशीच अशोक चव्हाण यांना खासदारकी देण्यात आली."

हीच मोदीची गॅरंटी - “भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतं आहे. नोटीस, समन्स देऊन तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ हीच मोदीची गॅरंटी आहे. ५० वर्षे जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवला,” असं शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा-

  1. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर? काय आहे कारण?
  2. लवासा प्रकरण! शरद पवारांकडून उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज; आरोप फेटाळले
Last Updated :Mar 7, 2024, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.