ETV Bharat / state

नाशिक आणि कोकणात 'कमळावर बाण' ताणलेलाच, दोन्ही मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने ठोकला दावा - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 5:49 PM IST

Mahayuti Seat Sharing Issue : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कोकण आणि नाशिक या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये अडून राहिला आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे उमेदवारीवर ठाम असून दुसरीकडे भुजबळ यांनी प्रचार सुरू केला आहे. तर कोकणातही सामंत आणि राणे यांच्यातील वाद सुटायचे नाव घेत नाही. दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने आता वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट शिवसेनेने दोन्ही जागा आपल्याच असल्याचा दावा कायम ठेवला आहे.

Mahayuti Seat Sharing Issue
शिवसेना विरुद्ध भाजपा

मुंबई Mahayuti Seat Sharing Issue : महायुती जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल असे भाजपाचे नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. नाशिकच्या जागेवरून शिंदे शिवसेना गट आक्रमक आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या ठिकाणी दावा सांगितलाय. दुसरीकडे कोकणात भाजपा नारायण राणे यांच्यासाठी आग्रही असून किरण सामंत यांनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने उमेदवारीवर दावा सांगितला आहे.

नाशिकमध्ये गोडसे विरुद्ध भुजबळ तणाव वाढला : नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अद्यापही जाहीर होऊ शकलेली नाही. गोडसे यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे. दिल्लीतून वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला अशा सूचना दिल्यामुळेच आपण प्रचाराला लागलो असल्याचं भुजबळ यांचं म्हणणं आहे. उलट शिंदे गटाने अजूनही या जागेचा दावा सोडलेला नाही. त्यामुळे या जागेचा तिढा चिघळत ठेवण्यातच वरिष्ठांना रस आहे का? असा प्रश्न आता स्थानिक नेते विचारू लागले आहेत.

कोकणात कमळावर बाण ताणलेलाच : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्यासाठी दावा कायम ठेवला आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा भाजपाचा मतदार संघ असून भाजपा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असा दावा करीत चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्या पाठोपाठ किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यांच्या भेटीनंतर त्यांनीही चार उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. त्यामुळे आता अंतिम अर्ज कोण भरणार याकडे लक्ष लागले आहे. या दोन जागांमुळे अडलेले महायुतीचे जागावाटप पूर्ण होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

दोन्ही जागांवर शिवसेनाच- वाघमारे : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता प्राध्यापिका ज्योती वाघमारे म्हणाल्या की, प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. मात्र, नाशिकमध्ये विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे या जागेवर आमचा दावा आहेच. शिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आणि बालेकिल्ला आहे त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे पक्षाकडेच राहतील आणि या दोन्ही जागांवर उमेदवार धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवेल आणि आमचा दावा सोडणार नाही, असा त्यांनी ठाम इशारा दिला आहे. राणे यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी अर्ज विकत घेण्याचा अधिकार आहे. मात्र, तो कोणाकडून भरला जातो, हे महत्त्वाचे आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते यासंदर्भात निश्चित निर्णय घेतील. मात्र, महायुती मध्ये समन्वयाने निर्णय होईल. महाविकास आघाडी प्रमाणे आमच्यात कुठलाही तमाशा होणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लवकरच उमेदवारी घोषित होईल - उपाध्ये : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, महायुतीमध्ये जागा वाटपा संदर्भात कोणताही तिढा नाही. काही जागांबाबत जी अडचण निर्माण झाली आहे, त्याबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आणि योग्य तो निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. मात्र, खूप मोठ्या अडचणी आहेत अशी कुठेही परिस्थिती नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग ची जागा ही आमची आहे आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय होऊन उमेदवारी घोषित होईल, टप्पा निहाय निवडणुका असल्यामुळे उमेदवारी घोषित व्हायला वेळ लागतो आहे. परंतु कोणत्याही अडचणी आहेत म्हणून लांबवले जाते आहे ,असे म्हणता येणार नाही, असेही उपाध्ये यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

  1. चंदा दो धंदा लो.. हा खेळ महाराष्ट्रात सुरू; 'श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटींचा घोटाळा,' संजय राऊतांचा गंभीर आरोप - Sanjay Raut Allegations
  2. न्यायव्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न, 21 माजी न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र - Retired judges letter
  3. "अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळंच भारत विश्वचषक हरला"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - uddhav thackeray on amit shah
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.