ETV Bharat / state

चोरांच्या सरदारांनी भाजपाच्या खात्यात ८ हजार कोटी गोळा करणं म्हणजे हप्ता वसुली- संजय राऊत - Sanjay Raut News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 1:33 PM IST

Sanjay Raut
संजय राऊत

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना औरंगजेब पाठोपाठ आता महंमदअली जिना यांच्याशी केली आहे. या चौघांचाही जन्म गुजरातमध्ये झाला होता, असंही ते म्हणाले. यावेळी निवडणूक रोख्यांवरूनही खासदार राऊत यांनी भाजपावर टीका केली. ते मिरजमध्ये गुरुवारी जनसंवाद मेळाव्यात बोलत होते.

सांगली Sanjay Raut : खासदार संजय राऊत म्हणाले, "दिल्ली आणि गुजरातच्या सुलतानांचा महाराष्ट्रावर हल्ला सुरू आहे. ज्या गुजरातमध्ये औरंगजेब आणि महंमद अली यांचा जन्म झाला त्याच गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा जन्म झाला.

नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंची भीती वाटते : संजय राऊत म्हणाले की, "सांगलीच्या मैदानात चंद्रहार लढणार आणि जिंकणार आहे. विजयाची गदा आणि मशाल घेऊन जाणारी ही गॅरंटी सभा देत आहे. नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे यांची भीती वाटते. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे. यापुढे महाराष्ट्रात एकच गॅरंटी चालणार, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची गॅरंटी आहे. ते (पंतप्रधान) रोज एक गॅरंटी देत सुटले आहेत."

हा महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न : पुढे ठाकरे गटाचे नेते राऊत म्हणाले, " आज गुजरातच्या दोन नेत्यांचा महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. 400 वर्षांपूर्वी औरंगजेब रूपाने महाराष्ट्रावर संकट आलं होतं. तशीच स्थिती आता आहे. औरंगजेबी वृत्ती आज गुजरातमधून दिल्लीत गेली. दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून आली. औरंगजेब याचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्याचा जन्म झालेल्या दाहोद गावा शेजारी नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर दिल्लीची आक्रमणं का होत आहेत, हे कळले असेल. औरंगजेबानं केलेले कृत्य गुजरातचे राज्यकर्ते आता दिल्लीत करत आहेत. ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला, त्याच गुजरातमध्ये महंमद अली जिना यांचा देखील जन्म झाला आहे. त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली. आज दिल्लीत गेलेल्या दोघांचा जन्मदेखील गुजरातमध्ये झाला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. पण चाल करून येणार असेल तर याद राखा, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.

गोमांस विक्रीचा पैसा भाजपाच्या खिशात : खासदार राऊत यांनी निवडणूक रोख्यांवरून मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, " देशात सध्या निवडणूक रोख्याचा घोटाळा समोर आला आहे. धमकी देऊन ईडी आणि सीबीआय मागे लावून चोरांच्या सरदारांनी भाजपाच्या खात्यात 8 हजार कोटी गोळा केले. याला हप्ता वसुली म्हणतात. भाजपाकडून हिंदूत्वाचा ढोंगीपणा सुरू आहे. कारण गोवंश हत्याबंदी विरोधात आंदोलन केले. दुसरीकडं देशात गायींची कत्तल करून जगात गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्याकडून 250 कोटींचा निधी भाजपाचा खात्यात आला आहे. हे समोर आले आहे, असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा:

  1. "केजरीवाल यांच्या विचारसरणीला अटक करू शकत नाहीत"; अटकेनंतर 'आप' नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल - Arvind Kejriwal arrested
  2. राऊत यांच्या विधानाची तक्रार निवडणूक आयोगात करणार; आशिष शेलार यांची प्रतिक्रिया - Ashish Shelar on Sanjay Raut
  3. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक; 'आप'ची सर्वोच्च न्यायालयात धाव - ED Arrest Arvind Kejriwal
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.