ETV Bharat / state

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात : कारची ट्रकला जोरदार धडक, तीन जण ठार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 1:26 PM IST

Samruddhi Highway Accident
अपघातात चक्काचूर झालेली कार

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची मालिका अद्याप थांबली नाही. शुक्रवारी शिर्डीजवळ अपघातात तीन भाविक ठार झाल्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा दौलताबादजवळ भीषण अपघात झाला. यात तीन नागरिकांचा बळी गेला आहे.

छत्रपती संभाजीनगर Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला असून पुन्हा तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यावर शनिवारी मध्यरात्री तशाच अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानं दोन दिवसातील अपघातात सहा जणांचा बळी समृद्धी महामार्गावर गेला आहे. राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात, अण्णा रामराव मालोदे अशी मृतांची नावं असून, हे सर्व छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी अपघात : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी रात्री संभाजीनगरच्या दौलताबाद जवळ पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून, कारनं अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिल्यानं अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात, अण्णा रामराव मालोदे अशी मृतांची नावं असून, सर्व छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. अशाच प्रकारचे अपघात सतत होत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

शुक्रवारी रात्री देखील झाला होता अपघात : कोपरगाव तालुक्यातील धोत्रा इथं झालेल्या अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले होते. अपघातात मृत पावलेले तिघंही जालना जिल्ह्यातील कोपरगाव इथले रहिवासी होते. पाचही जन शिर्डी साई बाबांच्या दर्शनासाठी जात असताना अपघात घडला. समृद्धीवर बंद पडलेल्या कंटेनरवर वेगानं आलेली कार धडकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथून शिर्डी साई बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या गाडीचा हा अपघात घडला. यात भाऊसाहेब पैठणे, राहुल राजभोज, उमेश उगले यांचा जागीच मृत्यू झालाय. तर वाघ आणि फलके नावाचे युवक जखमी झाले होते. सतत होणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा होत चाललाय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

  1. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: कंटेनरला धडकून कारचा चुराडा, तीन ठार
  2. बुलडाणा : एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 1 ठार तर 15 प्रवासी जखमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.