ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिन विशेष; संविधान प्रसाराचे असेही चार स्तंभ; 137 जागर सभा आणि 22 हजार संविधान पुस्तिकेचे मोफत वाटप

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 7:52 PM IST

Republic Day Special
संविधान विशेष

Republic Day Special: चंद्रपूरातील चार ज्येष्ठ नागरिकांनी संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (Constitution Jagar Sabha) ठिकठिकाणी संविधान जागर सभा घ्यायची आणि संविधानात भारतीय नागरिकांना दिलेले हक्क आणि त्याचे महत्त्व पटवून द्यायचे असा उपक्रम नित्यनेमानं सुरू आहे. (Constitution Handbook) मागील दीड वर्षांत तब्बल 137 जागर सभा तर 22 हजारांच्यावर संविधान पुस्तिकेचे मोफत वाटप त्यांनी केले आहे.

संविधानाच्या उपयुक्ततेविषयी सांगताना सामाजिक कार्यकर्ते

चंद्रपूर Republic Day Special: 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही प्रस्थापित झाली. (Constitution of India) शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता ह्या चार स्तंभावर देशाची लोकशाही आधारित आहे. मात्र, 73 वर्षे लोटून त्याचे मूल्य आणि महत्त्व अद्याप तळागाळापर्यंत पोहोचले नाही. (Importance of Constitution) ह्या संविधानाचे महत्त्व जनसामान्यांना कळावे आणि लोकशाही मजबूत व्हावी या उद्देशाने चंद्रपूरातील चार ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.

कोण आहेत हे ज्येष्ठ नागरिक? अशोक घोटेकर हे आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्थेचे अध्यक्ष ते आहेत. या माध्यमातून गोरगरीब होतकरू मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य ही संस्था पुरवते. किशोर सवाने हे जलसंपदा विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत होते. या दरम्यान ते Dr. Babasaheb Ambedkar National Association of Engineers (बाणाई) मध्ये जुळले गेले. या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. 2018 ला सेवानिवृत्त झाल्यावर ते सामाजिक कार्यात अधिक सक्रिय झाले. शंकर वेल्हेकर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. 2014 मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर ते सपत्नीक सामाजिक कार्यात सक्रिय झाले. शेषराव सहारे हे जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. 2017 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.


असा झाला उपक्रम सुरू: भारतीय संविधान हे 25 भागात आणि 12 अनुसूचित विभागले गेले आहे. तसेच त्यात 395 कलम आहेत. ह्याच संविधानातून मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला समान अधिकार प्राप्त झाले आहेत. मात्र, याबाबत सामान्य नागरिक अजूनही जागरूक नसल्याचे चित्र दिसून येत होते. याबाबत अशोक घोटेकर यांनी इतर सहकाऱ्यांशी चर्चा केली. यातून संविधानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आपण संविधान जागर सभा घेण्याचा निर्णय त्यांनी सुरू केला.


जिल्हाधिकारी यांनी दिले पाठबळ: 2021 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती निमित्त पुढच्या वर्षभरात 130 संविधान जागर सभा घेण्याचा निर्धार घोटेकर यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन हे देखील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून संविधानाचा जागर कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याचे आवाहन केले. निदान 300 संविधान जागर सभा घेण्याची त्यांनी विनंती केली. एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात असा जागर घेण्यात यावा याबाबत परिपत्रक काढले. पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदेकडून देखील असेच परिपत्रक काढण्यात आले.


137 जागर सभा, 22 हजार पुस्तिका: 14 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत 137 संविधान जागर सभा घेण्यात आल्या आहेत तर 22 हजारांहून अधिक संविधान पुस्तिकांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगर परिषद, शाळा, महाविद्यालय, विद्युत विभाग, खासगी कंपन्या इत्यादी ठिकाणी ह्या जागर सभा घेण्यात आल्या आहेत. संविधान पुस्तिकेत नागरिकांना सोप्या भाषेत आपले अधिकार आणि कर्तव्ये यांची मांडणी केली असते.

हेही वाचा:

  1. आता अध्यादेशाशिवाय माघार नाय; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
  2. आजची रात्र इथंच, उद्या आझाद मैदानावर जाणार; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा
  3. बिबट्याच्या हल्लात 8 दिवसात दुसरा बळी, बिबट्यांची पिंजऱ्यांना हुलकावणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.