ETV Bharat / state

प्रचारात मग्न नेते मंडळींची दीक्षाभूमीवर मांदियाळी; पाहा व्हिडिओ - Dr Ambedkar Jayanti 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 4:21 PM IST

Dr Ambedkar Jayanti 2024 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar) यांच्या 133 व्या जयंती निमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयानांतर्फे अभिवादन करण्यात आले. सकाळपासूनच शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर (Diksha Bhoomi ) असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनीदेखील दीक्षाभूमी येथे येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि प्रतिक्रिया दिली.

Dr Ambedkar Jayanti 2024
नेते मंडळींची आज दीक्षाभूमीवर मांदियाळी

प्रतिक्रिया देताना राजकिय नेते

नागपूर Dr Ambedkar Jayanti 2024 : देशातील कोट्यवधी बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी येथे (Diksha Bhoomi) आज भीमसगर लोटलाय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या 133 व्या जयंती निमित्त आज लाखो बौद्ध अनुयानांतर्फे अभिवादन करण्यात आलंय. सकाळपासूनच शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीत नतमस्तक झाले आहेत. तर दुसरीकडं आज नेत्याच्या ही रांगा लागल्या आहेत. देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), जयंत पाटील (Jayant Patil) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh), काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दीक्षाभूमी येथे येऊन अभिवादन केलं आहे.

माणूस हा जातीनं नाही गुणानं मोठा होतो : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमी येथे हजेरी लावली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजातली जी अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे. सामाजिक समता, आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हा विचार त्यांनी दिला. माणूस हा जातीनं नाही गुणानं मोठा होतो. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं.आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर समाजाकरता आणि देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा ते देत राहतील.



संविधानामुळं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला : देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन केलं. क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला असं संविधान दिलं की, ज्या संविधानामुळं आपल्या देशामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला. समतेच राज्य स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला. आज प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होतोय. कारण भारताचं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील म्हणतात कुठल्याही ग्रंथापेक्षा भारताचं संविधान हे जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की, संविधानामुळं आज भारत प्रगतीकडं चाललेला आहे. बाबासाहेब आंबेडकर देशाचे कायदे मंत्री होते. त्या काळामध्ये इरिगेशन, पावर आणि लेबर यामध्ये मूलभूत काम केलं त्याच्यावरच आज आपला देश उभा आहे. म्हणून अशा या महामानवाला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संविधान वाचवण्यासाठी लढत राहू : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीच दर्शन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे आलोय. संसदमध्ये सकाळीच जयंती साजरी करून थेट नागपूर आलोय, ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. त्याच वाटेवर सर्व लोक चालावे हीच आमची अपेक्षा आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवाचं आहे. त्यामुळं देशातील गरीब लोकांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळेल. याला वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि लढत राहू.



पदोपदी आज देशाला संविधानाची गरज : डॉ. आंबेडकर यांच्या कर्तृत्वामुळं देशाला संविधान मिळालं. त्यासाठी त्यांना आज वंदन केलय. आपल्या देशासाठी संविधान किती महत्त्वाचं आहे. हे आज पदोपदी जाणवत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे नेते) जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. "चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण, जनता...", -सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल - Sanjay Raut today News
  2. "बारामती लोकसभेची निवडणूक विचाराची लढाई, नात्याची नाही"; सासऱ्यांच्या टीकेवर सुनेचं उत्तर - Sunetra pawar
  3. "अमोल कोल्हे यांचं कर्तव्य मलाच पार पाडावं लागतं, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ..", शिवाजीराव आढळरावांचा आरोप - Shirur Lok Sabha Constituency
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.