ETV Bharat / state

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत राज्य सरकारला चिंता, वैद्यकीय तपासणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 8:30 PM IST

Mumbai High Court order
मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे त्यांच्या ढासळत चाललेल्या प्रकृतीविषयी मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या खंडपीठानं मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. अशा स्थितीमध्ये त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, असे देखील न्यायालयानं याप्रसंगी तोंडी नमूद केलं.

मुंबई Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळेला खंडपीठानं आदेश दिले की, मनोज जरांगे यांची तब्येत चिंताजनक आहे. उद्या काही झालं तर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणाऱ्या जालन्याच्या डॉक्टरांना जबाबदार धरायचं का? असा सवाल जरांगेंच्या वकिलांना विचारत खंडपीठानं मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. अशा स्थितीमध्ये त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, असं देखील न्यायालयानं या प्रसंगी तोंडी नमूद केलं. याबाबत खंडपीठ रात्री उशिरा आदेशपत्र जारी करणार आहे.



गुणरत्न सदावर्तेकडून याचिका दाखल : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणारी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून दाखल झालेली होती. त्या याचिकेवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं जरांगे उपचार घेणार आहेत किंवा नाही याची माहिती घेऊन सांगा, असं म्हटलं होतं. परंतु आज मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ठोस उत्तर आलं नाही. त्यामुळे न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं मनोज जरंगे पाटील यांची तब्येत बिघडू नये, यासाठी डॉक्टर विनोद चावरे यांच्याशी सल्लामसलत करून वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांना वैद्यकीय मदत घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे संकेत न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत.


सरकारी वकिलांनी दिली ही माहिती : शासनाच्या वतीनं महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ यांनी स्पष्ट केले की, मनोज जरांगे यांची तब्येत खूप ढासळलेली आहे. शासनास त्यांची काळजी आहे. त्यांना औषधोपचार, वैद्यकीय मदतीची गरज आहे. परंतु ते त्यास नकार देत आहेत. तरीदेखील शासनाची आरोग्य यंत्रणा म्हणून जरांगे पाटील यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे."

काय म्हणाले जरांगे पाटील यांचे वकील? उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं जरांगे यांच्या वकिलांना विचारलं की," मनोज जरांगे उपचार आणि वैद्यकीय मदत घेण्यास नकार देत आहेत. उद्या जर काही बरं वाईट झालं तर आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या वैद्यकीय शल्य विशारद यांना जबाबदार धरायचं का? असा खडा सवाल जरांगे पाटलांच्या वकिलांना केला. त्यावेळी जरांगे पाटील यांच्या वकिलांकडून ठोस उत्तर आलं नाही. त्यांनी उत्तर दिलं की, "प्रत्यक्ष डॉक्टरांची यासंदर्भात बोलूनच अंतिम माहिती देता येईल.



'या' वकिलांनी मांडली बाजू : न्यायालयानं आपल्या तोंडी आदेशामध्ये नमूद केलं की, मनोज जरांगे पाटील यांची ढासळलेली तब्येत पाहता जालन्याचे डॉ. मनोज चावरे यांच्याकडून उपचार केले जातील. त्यांची तब्येत सुधारली पाहिजे. याबाबतचे आदेशपत्र न्यायालय उशिरा जारी करेल. मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील राजेश डूबे पाटील तसेच आशिष गायकवाड आणि अनिरुद्ध रोटे यांनी बाजू मांडली. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः त्यांची बाजू मांडली.

हेही वाचा:

  1. राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
  2. 'महाभारत' फेम 'कृष्ण' नितीश भारद्वाज यांनी आयएएस पत्नीवर केले गंभीर आरोप
  3. लोकसभा निवडणुकीपूर्वी ममतांना मोठा झटका; अभिनेत्री मिमी चक्रवतीनं दिला खासदारकीचा राजीनामा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.