ETV Bharat / state

दहा वर्षांत पालघरचा विकास ठप्प, आमदार राजेश पाटील यांचा आरोप; म्हणाले आमच्याकडे पालघरच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार - RAJESH PATIL ON PALGHAR

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 6:38 PM IST

Rajesh Patil On Palghar : पालघर लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षातील खासदारांनी काहीही काम केलेलं नाही. बळीराम जाधव यांनी खासदार असताना भरपूर विकासकामं केली होती; परंतु गेल्या दहा वर्षांत निष्क्रिय खासदारांमुळे पालघर जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे गेल्याची टीका बहुजन विकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी केली.

Rajesh Patil On Palghar Devp
राजेश पाटील (Reporter)

पालघर Rajesh Patil On Palghar Devp : आमदार राजेश पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षांतील खासदारांना पालघर लोकसभा मतदारसंघात विकासाचा ठसा उमटवता आला नाही. रेल्वेसह अन्य प्रश्न मागे पडले. बळीराम जाधव यांनी डहाणू, पालघर, विरार वसई आदी ठिकाणचे रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले होते. त्यांनी त्यांच्या काळात पाईपलाईनद्वारे गॅससह अनेक योजना आणल्या. वसई-विरार शहरासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी आणला होता; परंतु त्यानंतर मात्र असं काम झालं नाही, असं निदर्शनास आणून खासदार कोणत्या पक्षाचा आहे, यापेक्षा तो किती कार्यक्षम आहे यावर निधी येत असतो, असं पाटील यांनी सांगितलं.


आम्ही बी टीम नाही, स्वयंभू : महाविकास आघाडी आणि महायुती अशा कोणत्याही सरकारमध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, तर मतदारसंघातील विकासकामांच्या निधीसाठी आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता, असं निदर्शनास आणून पाटील म्हणाले की, भाजपाची आम्ही बी टीम नाही किंवा ए टीमही नाही. आयपीएलमधल्या खेळांडूसारखे आम्ही लिलावाने आलेलो नाहीत. आम्ही स्वयंभू आहोत. विकासाच्या प्रश्नांची जाण आम्हाला आहे. राष्ट्रीय पक्ष असो किंवा स्थानिक पक्ष, त्यावर काही अवलंबून नसतं. स्थानिक पक्षाच्या एका सदस्याची किंमत काय असते, हे विलासराव देशमुख यांच्यावेळी अनुभवाला आलं आहे. एका मतासाठी सरकार पडत असताना आम्ही पाठिंबा देऊन त्या बदल्यात वसई-विरारच्या दोनशे कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा प्रश्न निकाली काढला होता, अशी आठवण राजेश पाटील यांनी दिली.

काँग्रेसला पाठिंब्याच्या बदल्यात कामे : बहुजन विकास आघाडीने काँग्रेसला २००९ मध्ये लोकसभेत पाठिंबा देऊन त्या बदल्यात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या प्रश्नांवर भर आहे या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले की, पालघर लोकसभा मतदारसंघात आदिवासी, अल्पसंख्याक, मच्छीमार, बागायतदार असे सर्व घटक आहेत. या सर्व घटकांचा विचार करून या भागात रस्ते, पाणी, वीज आदी सुलभरीत्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


पर्यटनाला वाव देणार : गेल्या दहा वर्षांत रखडलेला विकास आता गतिमान करावा लागेल. त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघात भूसंपादनासह प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत. प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांत प्राधान्य आणि त्यांचं पुनर्वसन अशा विविध अंगाने काम करावे लागेल. पालघर जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे आणि पर्यटन विकासाचा आराखडा तयार करून त्यादृष्टीने काम करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे. कोकणात पर्यटन हा प्रमुख उद्योग आहे. बाहेरच्या राज्यातून तसंच पालघर परिसरातूनही कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची सोय व्हावी, म्हणून ज्यादा रेल्वे आणि त्यांच्या थांब्याची सुविधा करण्यावर आमचा भर असेल, अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली.

कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालय : पालघर हा आदिवासी जिल्हा आहे. येथील शेतकरी, बागायतदार यांना योग्य ते मार्गदर्शन मिळून येथील शेतीचे प्रश्न सोडवणे आणि एकरी उत्पादकता वाढवणे अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठी आणि संबंधितांना मार्गदर्शन करण्यासाठी पालघर जिल्ह्यात कृषी महाविद्यालय आणण्यावर आमचा भर आहे. तसंच शेती आणि अन्य उद्योगांना पूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसाय वाढावा यासाठी डेअरी डेव्हलपमेंटची एखादी योजना या जिल्ह्यात सुरू करण्याचे नियोजन आहे, असं ते म्हणाले. आदिवासी जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. येथे शाळा महाविद्यालयांची संख्या कमी आहे. शिक्षकांची संख्या कमी आहे. या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार करून तसे धोरण घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यात दवाखाने, डॉक्टर, परिचारिका अशा सुविधा तसंच कामगारांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस असून त्यासाठी आराखड्यात नियोजन केलं आहे, असं राजेश पाटील यांनी सांगितलं.


युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देणार : पालघर मुंबई लगतचा जिल्हा असून या जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं, म्हणून कौशल्याधारित विकास योजना आणि त्यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करणारी एखादी संस्था असावी, असाही प्रयत्न आहे. त्यातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक युवकांना पालघर जिल्ह्यात तसंच अन्य ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकेल. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर असून त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जव्हार, मोखाडा, तलासरी ठिकाणी पाणी योजना असूनही तेथील महिलांना तसेच वाड्या-पाड्यातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या पाणी योजना आणि मोठ्या स्वरूपाच्या प्रादेशिक योजना आणून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठीही प्रयत्न आहे, असा विचार आमदार राजेश पाटील यांनी मांडला.

हेही वाचा :

  1. महायुतीच्या उमेदवारांकरिता पंतप्रधान मोदी आज नाशिकसह कल्याणमध्ये घेणार सभा, मुंबईत करणार रोड शो - PM Modi Maharashtra visit
  2. कांद्यावरुन मोदींविरोधात तरुणांची भर सभेत घोषणाबाजी; पंतप्रधान मोदी मात्र उद्धव ठाकरेंवर बरसले - pm narendra modi
  3. अस्मितेसाठी महाराष्ट्र पेटून उठत नाही ही खंत - इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत; तर पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी, विरोधकांची मागणी - Narendra Modi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.