ETV Bharat / state

Mahashivratri 2024: घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी; काय आहे मंदिराचं महत्त्व आणि इतिहास?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 8:23 AM IST

Mahashivratri 2024: घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी; काय आहे मंदिराचं महत्त्व आणि इतिहास?
Mahashivratri 2024: घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी; काय आहे मंदिराचं महत्त्व आणि इतिहास?

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांनी मध्यरात्रीपासुनच गर्दी केलीय. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग अशी घृष्णेश्वर मंदिराची ओळख आहे.

घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या निमित्त सर्वच शिवमंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. महत्वाचं मानलं जाणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी पाहायला मिळाली. हर हर महादेवाचा जयोघोष करत भाविकांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं. काही भाविक या दिवशी आपला पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी येत असतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. अवजड वाहनांची रहदारी पुढील चार दिवसांसाठी बंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलीय.


मध्यरात्रीपासून शिवभक्तांची गर्दी : महाशिवरात्रीच्या दिवशी महिला विशेष शिवज्योत घेऊन जात असतात. भव्य मिरवणूक काढून घृष्णेश्वर मंदिरातून चार वाजता हा दीप घेऊन पालखी शिव कुंडावर जाते. तिथं अभिषेक झाल्यावर पुन्हा ती ज्योत मंदिरात स्थापित केली जाते. महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल होतात. मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात. रात्री बारा वाजता भगवान शंकराची आरती करुन भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येते. दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता शासकीय पूजा आणि आरती केली जाते. त्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं ठेवलं जातं. स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, याकरिता त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करुन दिली जाते. बाहेरुन येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था, उपवास असल्यानं पाणी आणि फराळाची सोय केली जाते. तर वाहनांना मंदिर परिसरात येण्यास मनाई असून त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात येतात.

नवसाला पावणारं देवस्थान : भगवान शंकराचे देशभरात 12 ज्योतिर्लिंग असून त्यात प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे वेगवेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळते. सर्व मंदिराची परिक्रमा पूर्ण करताना शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. पहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत. तर घृष्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारे घृष्णेश्वर भगवान असं मानलं जातं. त्यामुळं महाशिवरात्रीला अनेक भाविक आपला नवस फेडण्यासाठी येतात. कोणी महाप्रसाद तर कोणी फळं वाटून आपला नवस पूर्ण करतात. देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही अशी श्रद्धा आहे. त्यामुळं देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येत असतो. तर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येनं भक्त दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात दाखल होतात. आपली मनोकामना मागून भगवान शंकराचा जयघोष करत असतात.

लाल रंगाच्या दगडातील बांधकाम : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. मंदिराचं बांधकाम लाल दगडात करण्यात आलं आहेत. त्यावरील नक्षीकाम सर्वांना आकर्षित करते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज मालोजीराजे भोसले यांनी 16 शतकात मंदिराचं प्रथम जीर्णोद्धार केले होते. त्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी 1730 मधे मंदिराचे बांधकाम केलं. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा जीर्णोद्धार केल्याची इतिहासात नोंद आहे.

घृष्णेश्वर मंदिर कुठे आहे? छत्रपती घृष्णेश्वर मंदिर हे छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. वेरुळ गावातील येलगंगा नदीजवळ असलेलं हे पवित्र धार्मिक स्थळ आहे. देशाच्या कानोकोपऱ्यातून छत्रपती संभाजीनगपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे आहेत. रेल्वेनं तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचू शकता. वेरुळ येथे हे मंदिर असल्यानं भाविकांना देवदर्शनाबरोबरच जागतिक वारसास्थळ असलेल्या अंजिठा आणि वेरुळला भेट देणं शक्य होतं.

हेही वाचा :

  1. महाशिवरात्रीला 'या' राशीच्या लोकांना मिळेल भगवान शिवाचा आशीर्वाद; वाचा राशीभविष्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.