ETV Bharat / state

कॉन्ट्रकर मित्र जोमात, शेतकरी कोमात... उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावरून सरकारवर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 8:05 PM IST

विधानसभेत आज अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मागचे पाढे पुढे अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज मंगळवार (दि. 27 फेब्रुवारी) रोजी मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. तर, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्प चांगला आणि सर्व घटकांचा विचार करुन अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला असल्याचं म्हटलं आहे. तर, ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या अर्थसंकल्पावरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

मागच्याच घोषणांजी उजळणी : माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "हा फसवा आणि तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प होता. मागचेच पान पुढं ढकललं आहे. यामध्ये कुठल्याही घटकाला ठोस काही मिळालेली नाही. सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. पुढचे पाठ आणि मागचे सपाट असा हा अर्थसंकल्प आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

कॉन्ट्रकर मित्र जोमात शेतकरी कोमात : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आजचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे ''कॉन्ट्रकर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात'' आहेत. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये फक्त आणि फक्त घोषणांची खैरात आहे. बाकी काहीही नाही. अवकळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल असं वाटत होतं. मात्र, शेतकऱ्यांना कोणतीच मदत सरकारकडून मिळाली नाही. विकासाच्या नावाखाली करोडो रुपयांच्या योजनांच्या घोषणा झाल्या. पण त्यातून हाती काही लागलं नाही,ठ असा निशाणा उद्धव ठाकरेंनी सरकारवर साधला.

सर्व घटकांची निराशा : "राज्यात अंगणवाडी सेविकांच्या पगाराच्या प्रश्नाबाबत देखील तोडगा निघाला नाही. राज्यातील शिवकालीन गडकिल्ले यासाठी काही तरतूद किंवा मोठी घोषणा होईल, असं वाटत होते. मात्र, तसं झालं नाही. मुंबईतील रस्त्याचा घोटाळा आहे. टेंडरवर टेंडर काढली जात असून त्यात भ्रष्टाचार केला जात आहे. महिला, विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी यासह सर्वच घटकांना अर्थसंकल्पातून काहीही मिळालं नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मनोज जरांगे-पाटलांना अतिरेक्यांसारखे वागवले : "मनोज जरांगे-पाटील यांची मागणी काय आहे? त्याचा सरकारने विचार केला पाहिजे. आंदोलन करत असताना. तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला. मनोज जरांगे-पाटलांना अतिरेक्यांसारखं वागवलं. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. परंतु मनोज जरांगे-पाटील यांचीच एसआयटी चौकशी लावली आहे. मग या सरकारला काय म्हणायचे? मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना, अजून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही प्रयत्न केला होता. पण या सरकारकडून काही होत नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली.

हेही वाचा :

1 हिमालयात तपश्चर्या नाही, यांनी केलं लग्न! उणे 25 अंश सेल्सिअस तापमानात झालं डेस्टिनेशन वेडिंग

2 जरांगे पाटलांसारखा मुस्लिमांनी आरक्षणासाठी लढा दिला असता तर कब्रस्तान भरले असते- अबू आझमी

3 अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 : पोलीस शिपाई पदाच्या १७ हजार ४७१ रिक्त जागा भरण्यात येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.