ETV Bharat / state

महाराष्ट्र एनसीसी संघाचं राज्यपालांनी केलं अभिनंदन, एनसीसीनं पटकावला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप चषक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 6:40 PM IST

Maharashtra Governor
राज्यपाल रमेश बैस

Maharashtra NCC : दिल्लीत कर्तव्य पथावर राज्याच्या एनसीसीच्या चमूनं यंदाही बाजी मारली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं घेतलेल्या त्यांच्या स्पर्धांमध्ये ट्रॉफी मिळवल्या आहेत. त्यांचं कौतुक राजभवनात राज्यपालांनी केलं.

मुंबई Maharashtra NCC : महाराष्ट्र एनसीसीच्या चमूनं नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठेचा पंतप्रधानांचा ध्वज-निशाण चॅम्पियनशिप चषक पटकावला आहे. ल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी या चमूतील एनसीसीच्या सर्व विद्यार्थ्य्यांचा महाराष्ट्र राजभवनात सत्कार केला.

विद्यार्थ्यांनी स्वावलंबी झालं पाहिजे : विकसित देशांमधील लोकांमध्ये सार्वजनिक जीवनात शिस्त, नागरी कर्तव्याप्रती जागरुकता दिसून येते. त्यामुळं विकसित भारताचं उद्दिष्ट गाठताना, सर्वांनी शिस्त, नियमांचं पालन करणारे जबाबदार नागरिक झालं पाहिजं, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय. ते आज राजभवनात बोलत होते. राज्यपाल पुढं बोलताना म्हणाले की, आपण स्वतः एनसीसीचे 'सी' प्रमाणपत्र धारक असून एनसीसीमध्ये देशभक्ती, शिस्तीचे संस्कार बिंबवले जातात. प्रत्येक विद्याथ्यानं एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना यांसारख्या राष्ट्रीय संघटनेमध्ये गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात स्वावलंबी झालं पाहिजे, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

नागरिकांना शिस्त लावणं आवश्यक : विदेशात गेल्यावर लोक चॉकलेटचे आवरण खिशात ठेवतात, त्यानंतर योग्य वेळी कचरापेटीत टाकतात. आपल्याकडं मात्र, अनेकदा लोक कचरा वाटेल तेथे टाकतात. वाहतुकीच्या सिग्नलचं उल्लंघन करतात. कित्येकदा रेल्वे क्रॉसिंग बंद असताना फाटक ओलांडून जातात. याकरता शिस्त लावणं आवश्यक आहे, असं राज्यपालांनी सांगितलं.

युवावर देशाचं भवितव्य अवलंबून : देश पारतंत्र्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीनं परकीय शक्तींचा संपूर्ण शक्तीनिशी प्रतिकार केला होता. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीनं अग्रेसर होत आहे. भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र झालं आहे. युवक राष्ट्रकार्यात कसे सहभागी होतात, यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे, असं सांगून एनसीसी कॅडेट्सनी आपण निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात समाजाला नेतृत्व प्रदान करावं, असं आवाहन राज्यपालांनी केलं. यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये आयोजित विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रजत, कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली.

23 वेळा बॅनर; चार वेळा हॅटट्रिक : महाराष्ट्र एनसीसीनं आजवर 23 वेळा पंतप्रधानं चषकाचं बॅनर मिळवलं आहे. तसंच सलग तीन वेळा बॅनर जिंकून आतापर्यंत एकूण चारदा हॅटट्रिक केली असल्याचं अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंह यांनी सांगितलं. एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केलेले अनेक युवक सैन्यदलात भरती झाले असून यावर्षी अनेक जण ‘अग्निवीर’ म्हणून सैन्यदलात रुजू झाले, असं त्यांनी म्हटलंय. यावेळी कर्नल एम. देवैया मुथप्पा, ब्रिगेडियर विक्रांत कुलकर्णी तसंच तिन्ही सैन्य दलातील अधिकारी 122 कॅडेट्स उपस्थित होते.

महाराष्ट्र NCC ने जिंकलेल्या ट्रॉफी :

1. पंतप्रधान चॅम्पियनशिप ट्रॉफी

2. पंतप्रधान चॅम्पियनशिप बॅनर

3. सर्वोत्तम नौदल युनिट ट्रॉफी

4. सर्वोत्कृष्ट कॅडेट सीनियर डिव्हिजन एअर विंग गर्ल्स ट्रॉफी

5. पीएम रॅली मार्च पास्ट मधील सर्वोत्तम पथक

6. ‘टेंट पेगिंग’मध्ये सर्वोत्कृष्टतेसाठी ‘रूप ज्योती करंडक’

हे वाचलंत का :

  1. भारतीय रेल्वेच्या 40,000 बोगी वंदे भारत कोचमध्ये रूपांतरित करणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
  2. बजेटच्या दिवशी झटका; महागला एलपीजी सिलेंडर
  3. धर्मेंद्रची नात निकिता चौधरी थाटामाटात अडकली लग्नबेडीत; फोटो व्हायरल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.