ETV Bharat / state

MNS MLAs Review : मनसेचे 'ते' 13 आमदार सध्या काय करतात? जाणून घेऊया आढावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 8:59 PM IST

Updated : Mar 21, 2024, 12:55 PM IST

MNS MLAs Review
राज ठाकरे

MNS MLAs Review : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 2009 मध्ये स्वबळावर 13 आमदार निवडून आणले होते. सध्या राज ठाकरे भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत. परंतु, या 13 आमदारांचे काय झाले याविषयी आपण बातमीच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत.

मुंबई MNS MLAs Review : मंगळवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशाचे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्याशी दिल्ली येथे युतीबाबत चर्चा केली. अशावेळी प्रश्न उभा राहतो खरंच महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड चालतो का? असं असेल तर 2009 साली स्वबळावर 13 आमदार निवडून आणणारी मनसे पुढे एका आमदारावर का आली? राज ठाकरे यांच्या लाटेत निवडून आलेले तेरा आमदार आता काय करतात? याचाच आढावा घेणारा ईटीवी भारतचा हा खास रिपोर्ट.

मनसेच्या स्थापनेचा आढावा : 2005 साली शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 2006 ते 2009 या तीन वर्षांत राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. विविध ठिकाणी सभा घेतल्या. पक्ष संघटन वाढवण्यासाठी काम केलं. यात राज ठाकरेंना जनतेचा भावनिक पाठिंबा देखील मिळाला. या सभांमध्ये राज ठाकरे 'संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया' अशी साद जनतेला घालायचे. यात त्यांच्या प्रभावी भाषण शैलीमुळे जनता त्यांच्याकडे आकर्षित झाली आणि 2009 मध्ये राज ठाकरे यांनी स्वबळावर मनसेचे 13 आमदार निवडून आणले. मात्र, या 13 आमदारांमधले आज केवळ दोनच आमदार राज ठाकरेंसोबत उरले आहेत. उर्वरित आमदार कुठे आहेत? आणि काय करतात? चला जाणून घेऊयात.


1) हर्षवर्धन जाधव : महाराष्ट्रातील सगळ्यात वादग्रस्त आमदार अशी यांची ओळख आणि भाजपा नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे हे जावई. मात्र हे लग्न टिकलं नाही. राजकारणातील सुरुवातीच्या काळात हर्षवर्धन जाधव शिवसेनेत होते. मात्र, ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली त्यावेळी हर्षवर्धन जाधव राज ठाकरे यांच्या सोबत आले. 2009 साली हर्षवर्धन जाधव कन्नड विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर उभे राहिले. त्यांच्या विरोधात उभे होते शिवसेनेचे उदयसिंह राजपूत. राज ठाकरे नावाच्या लाटेमुळे हर्षवर्धन जाधव यांनी 4,107 मतांनी निसटता विजय मिळवला. पुढे 2014 च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, यावेळी त्यांचा पक्ष वेगळा होता ते शिवसेनेतून उभे राहिले आणि जिंकून आले. म्हणजे पहिल्या पाच वर्षातच जाधवांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. 2019 मध्ये हर्षवर्धन जाधव अपक्ष उभे राहिले. पुढे 2020 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश केला. पण, नंतर रावसाहेब दानवे आणि भाजपसोबत झालेल्या वादामुळे त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.


2) उत्तमराव ढिकळे : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला सर्वांत जास्त यश आलं ते नाशिक जिल्ह्यातून. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून उत्तमराव ढिकले यांनी भाजपाच्या बाळासाहेब सानप यांचा तब्बल 18 हजार मतांनी पराभव केला होता. पुढे 2014 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला; मात्र दुर्दैवाने 2015 साली त्यांचं निधन झालं. आज त्यांचे चिरंजीव राहुल ढिकळे हे याच मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर आमदार आहेत.


3) वसंत गिते : शिवसेनेच्या वसंत गिते यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळवलं. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा तब्बल 31 हजार मतांनी पराभव केला. पुढे 2014 साली देखील मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी वसंत गिते यांचा 28 हजार मतांनी पराभव केला. 2015 मध्ये त्यांनी मनसेची साथ सोडली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये त्यांनी काही काळ काम केल्यानंतर पुन्हा 2021 साली शिवसेनेत प्रवेश केला.


4) नितीन भोसले : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत नितीन भोसले यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी राष्ट्रवादीच्या नाना महाले यांचा पराभव करून विधानसभेत एन्ट्री घेतली. पुढे 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या काळात त्यांनी मनसेची साथ सोडली नाही. अखेर 2023 मध्ये नितीन भोसले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.


5) रमेश रतन पाटील : रमेश पाटील हे मनसेकडे सध्या एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचे बंधू. रमेश पाटील हे 2009 च्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी काँग्रेसमध्ये होते. मात्र, अचानक त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि कल्याण ग्रामीण मधून निवडून आले. 2014 मध्ये देखील त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरच्या काळात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला; मात्र तिथे देखील त्यांचा टिकाव लागला नाही. अखेर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज त्यांचे बंधू राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत.


6) प्रकाश भोईर : प्रकाश भोईर हे मनसेच्या 13 आमदारांच्या बॅचमधील कल्याण पश्चिम मधील आमदार. त्यांनी 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांचा पराभव करून विधानसभा गाठली. पुढे 2014 आणि 19 मध्ये देखील त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा पराभव झाला. प्रकाश भोईर हे आजही मनसेत कार्यरत आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो.


7) मंगेश सांगळे : मंगेश सांगळे हे 2009च्या राज ठाकरे नावाच्या लाटेत विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांचा संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यापुढे 25 हजार मतांनी पराभव झाला. पुढे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे देखील त्यांचा पराभव झाला.


8) शिशिर शिंदे : राज ठाकरे शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी शिशिर शिंदे यांची ओळख. पुढे राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळी शिशिर शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांना साथ देत शिवसेनेला रामराम केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 30 हजार मतांनी विजय मिळवला. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. पुढे 2018 साली त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सध्या त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटात उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली. पण, जून 2023 मध्ये त्यांनी आपण नाराज असल्याचं सांगत शिवसेना ठाकरे गटाला देखील जय महाराष्ट्र केला.


9) राम कदम : राम कदम यांनी 2009 मध्ये घाटकोपर पश्चिम मधून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांनी भाजपा नेत्या पूनम महाजन यांचा पराभव केला होता. पुढे 2014 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेत आपल्यावर अन्याय होत असल्याचं कारण देत मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. आता 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला ते घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत.

10) प्रवीण दरेकर : प्रवीण दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढत मागाठणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला. 2014 मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. काही काळ मनसेत काम केल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने 2016 मध्ये त्यांना विधान परिषदेत निवडून दिलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करण्यात आलं. तर, आज महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे.


11) बाळा नांदगावकर : राज ठाकरे यांचे जे काही कट्टर आणि निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यापैकी एक म्हणजे बाळा नांदगावकर. 1995 मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. त्यावेळी नांदगावकर हे नाव महाराष्ट्राला पहिल्यांदा कळले. पुढे जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी देखील राज ठाकरे यांना साथ देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून उभे राहात शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. नांदगावकर आजही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे नंतर बाळा नांदगावकर यांचेच नाव आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घेतले जाते.


12) नितीन सरदेसाई : राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून जे काही त्यांचे विश्वासू सहकारी आणि कट्टर समर्थक मानले जातात त्यापैकीच एक नितीन सरदेसाई. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विधानसभेत गेले. मात्र, 2014 मध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या समोर त्यांचा निभाव लागला नाही आणि त्यांना मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. सरदेसाई आजही राज ठाकरेंसोबत आहेत. सध्या त्यांच्यावर मनसेच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


13) रमेश वांजळे : 2009 च्या 13 आमदारांपैकी राज ठाकरे आजही ज्यांचं नाव काढतात त्यातील एक नाव म्हणजे रमेश वांजळे. 2009 मध्ये पुण्याच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उभे राहत त्यांनी शिवसेनेच्या विकास दांगट यांचा तब्बल 22 हजार मतांनी पराभव केला होता. गोल्डन मॅन अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या गळ्यात एक भलं मोठं सोन्याचं लॉकेट होतं. त्यात राज ठाकरे यांचा फोटो होता. त्यामुळे ते मनसेत विशेष प्रसिद्ध होते. मात्र, 2011 मध्ये त्यांचं निधन झालं.

मनसेची अंतर्गत गटबाजी भोवली : 2009 मध्ये तब्बल 13 आमदार स्वबळावर निवडून आणणारी माणसं 2014 मध्ये काहीच करिश्मा दाखवू शकली नाही. असं का झालं? यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड सांगतात की, तळागाळातील कार्यकर्ते आणि मनसेची कोर कमिटी यांच्यात देखील अनेकदा मतभेद झाल्याचं समोर आलं आहे. आता याचं ताजं उदाहरण म्हणजे पुण्यातील वसंत मोरे प्रकरण. मनसेचा खळखटकचा चेहरा, राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी आणि मनसेला मिळणारी मतं यात प्रचंड तफावत दिसून येते. याला कारणीभूत मनसेची अंतर्गत गटबाजी आणि मनसेची दिवसेंदिवस कमी झालेला जनतेतील विश्वासार्तता असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

मनसेची प्रतिक्रिया देण्यास नकार : या संदर्भात मनसेची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले की, सध्याच्या चालू घडामोडीवर आमच्यापैकी कोणीही प्रतिक्रिया देणार नाही. तशा प्रकारचे आदेश आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. त्याच्यामुळे जे काही चित्र स्पष्ट होईल त्यानंतरच आम्ही माध्यमांशी बोलू.

भाजपाला ठाकरे ब्रँडची गरज : उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत युती तोडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केलं आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. अशात भाजपाला आता ठाकरे या नावाची गरज वाटते का? असा प्रश्न पडतो. कारण, भाजपाच्या महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळापासून ठाकरे हे नाव सोबत होतं. असं म्हणतात ठाकरे या नावामुळेच भाजपा महाराष्ट्रात वाढली. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपाचे आमदार महाराष्ट्रात निवडून येऊ लागले. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा भाजपासोबत युतीमध्ये काम केलं. मात्र, 2019 मध्ये दिलेला शब्द न पाळण्याचं कारण देत उद्धव ठाकरे यांनी भाजपा सोबतची युती तोडली. त्यामुळे आता भाजपाला ठाकरे ब्रँडची गरज असल्याचं बोललं जात आहे आणि हीच गरज भागवण्यासाठी भाजपाने राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी केल्याच्या चर्चा आहेत.

हेही वाचा :

  1. Vijay Shivtare: शिवतारेंमुळं महायुतीत मिठाचा खडा? ...तर आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
  2. JSW MG Motor first car इलेक्ट्रिक कार उत्पादनात मारुतीप्रमाणं स्थिती येईल, दर तीन महिन्यांत नवीन कार लाँच करणार-सज्जन जिंदाल
  3. MP Vinayak Raut : दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील - खासदार विनायक राऊत
Last Updated :Mar 21, 2024, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.