ETV Bharat / state

घाव घातला तर झाडातून निघतं रक्त? अनेक आजारांवर 'हे' झाड आहे गुणकारी, जाणून घ्या वैशिष्ट्ये - Indian redwood tree

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 8:19 PM IST

Updated : May 15, 2024, 9:05 PM IST

Indian redwood tree : प्राण्यांच्या आणि मानवी आजारावर अत्यंत उपयोगी ठरणारं झाड अशी 'इंडियन रेड वूड ट्री'ची ख्याती आहे. या झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातला की, रक्ताप्रमाणे भासणारं लाल रंगाचं पाणी बाहेर येतं. या झाडाच्या औषधी गुणधर्माविषयी आपण वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन तिप्पट यांच्याकडून माहिती जाणून घेऊया.

Indian Redwood Tree Properties
इंडियन रेड वूड ट्री (Reporter)

इंडियन रेड वूड ट्री या झाडाचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व सांगताना डॉ. सचिन तिप्पट (Reporter)

अमरावती Indian redwood tree : एखाद्या झाडावर कुऱ्हाडीने किंवा दगडाने वार केला आणि त्यातून प्राणी किंवा माणसाच्या शरीरातून निघतं तसं रक्त निघालं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. इंडियन रेड वूड ट्री, रोहण, रोहिणी, मासरोहिणी, रक्तरोहिणी, रक्तचंदन अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडातून माणसाच्या शरीरातून निघतं अगदी तसाच द्रव घाव मारल्यावर बाहेर येतो. आता हे झाड दुर्मीळ होत चाललं असलं तरी महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र हे झाड पाहायला मिळतं. अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या डोंगर भागात तसंच पोहरा जंगलात हे झाड आहे. या झाडाच्या विविध वैशिष्टांसंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पूर्वीच्या काळी आयुर्वेदात या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं समोर आलं. आज देखील आयुर्वेदात या झाडाचं महत्त्व कायम असल्याची माहिती अमरावती येथील नरसम्मा हिराया महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन तिप्पट यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

हे आहे झाडातून येणाऱ्या लाल रक्ताचं कारण : खरंतर प्रत्येक वृक्षामध्ये रेझिन्स असतात. ज्याप्रमाणे माणसाला इजा झाल्यावर त्याच्या शरीरातून रक्त बाहेर येतं त्याचप्रमाणे झाडाला इजा झाली तर त्यामधून रेझीन बाहेर पडतं. अनेक झाडांमध्ये पिवळ्या किंवा राखाडी रंगाचं हे रेझीन बाहेर पडतात. मास रोहिणी हे झाड कडुलिंब वर्गातील असून बाभळीच्या झाडाप्रमाणे या झाडातून निघणारं रेझीन हे लाल रंगाचं असतं. यामध्ये विष प्रतिकारक्षमता असल्यामुळे या झाडातील रेझीन हे लाल रंगाचं आहे. या झाडातून निघणारे हे रेझीन चिकट आणि घट्ट असून ते झाडातून बाहेर निघाल्यावर बराच वेळानंतर रक्तासारखे गडद लाल रंगाच्या रक्ताप्रमाणे भासतात, असं प्रा. डॉ. सचिन तिप्पट यांनी सांगितलं.


असं आहे या वृक्षाचं आयुर्वेदात महत्त्व : आयुर्वेदामध्ये मास रोहिणी या वृक्षाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात एखाद्याचे हाड मोडले तर ते जोडण्याकरिता या मासरोहिणी वृक्षाच्या सालीचा लेप हाड जोडण्यासाठी वापरला जायचा. तसंच सूज कमी होण्यासाठी देखील हा लेप गुणकारी आहे. पचनासाठी या झाडाची साल उपयुक्त आहे. पोट दुखत असेल तर या सालीचा औषध म्हणून उपयोग फायदेशीर ठरणार आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर याच्या सालीमध्ये असणाऱ्या 20 प्रतिकारक गुणधर्माचा लाभ होतो. पूर्वी अशा सर्वच विचारांसाठी या वृक्षाला महत्त्व होतं आज देखील आयुर्वेदात या झाडाची पानं फुल फळ साल आणि मूळ यांचा वापर विविध आजारांसाठी विविध औषधी तयार करण्यासाठी केला जात असल्याची माहिती देखील प्राध्यापक डॉ. सचिन तिप्पट यांनी दिली.


प्राण्यांसाठी महत्त्वाचे वृक्ष : या झाडाच्या बियांचा वापर कुंकू तयार करण्यासाठी केला जातो. मिठाईला रंग देण्यासाठी देखील या बिया वापरल्या जातात. प्राण्यांच्या आजारावर देखील हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे. जखमी असणारे प्राणी या झाडाची साल खाऊन स्वतःवर विविध व्याधींमध्ये उपचार करून घेतात. या झाडाची पाने हत्तीला फार आवडणारी आहेत. उत्तराखंड राज्यामध्ये ही वनस्पती संरक्षित वनस्पती म्हणून घोषित करण्यात आली आहे. या झाडाच्या सालीमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक आहे.


सर्वत्र आढळणारे वृक्ष होत आहे दुर्मीळ : महाराष्ट्रात पठारी भागात मांस रोहिणी हे वृक्ष सर्वत्र आढळतात. लाल माती असणाऱ्या प्रदेशात या झाडांची संख्या अधिक आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या पायथ्याशी हे झाड बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. तसंच अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा जंगलात बऱ्यापैकी ही झाडं आहेत. पूर्वी शेताच्या बांधावर हे झाड असायचं; मात्र आता विकासाच्या नावाखाली या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. याबाबत डॉ. सचिन तिप्पट यांनी खंत व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. अस्मितेसाठी महाराष्ट्र पेटून उठत नाही ही खंत - इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत; तर पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी, विरोधकांची मागणी - Political Reaction on Jiretop
  2. कांद्यावरुन मोदींविरोधात तरुणांची भर सभेत घोषणाबाजी; पंतप्रधान मोदी मात्र उद्धव ठाकरेंवर बरसले - pm narendra modi
  3. प्रफुल पटेलांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अन्यथा...; संभाजी ब्रिगेडचा इशारा - Praful Patel
Last Updated :May 15, 2024, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.