ETV Bharat / state

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिंदे गटाचा दावा..उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं मोठं वक्तव्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 5:57 PM IST

Updated : Feb 29, 2024, 7:02 PM IST

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात चुरस रंगली आहे. मात्र, या जागेवर शिंदे गटानं दावा ठोकल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते विधानभवनात माध्यमांशी बोलत होते.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha
उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना

मुंबई Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना जागा वाटपावरून सर्वच राजकीय पक्षात खलबते सुरू आहेत. अशात राज्यातही महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत. राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेकडे असलेल्या जागा आपणालाच हव्यात, अशा आग्रहाच्या भूमिकेत आहेत. अशातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदे गट आणि भाजपा दोन्ही बाजूनं दावा केला आहे. परंतु, ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडूनच लढवली जाणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.


४५ पेक्षा जास्त जागा जिंकू : मंत्री उदय सामंत म्हणाले की, ''शिंदे, फडणवीस आणि अजित पवार राज्याच्या विकासासाठी पुढे आले आहेत. सरकारच्यावतीनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. यात काही वावगं नाही. तसेच पंतप्रधान मोदी यांनी 'अबकी बार ४०० पार' म्हटलं आहे. त्यातच आम्हाला आत्मविश्वास आहे की, राज्यात आम्ही ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू.''

शिवसेनेने लढविलेल्या जागा हव्यात : महायुतीत जागा वाटपावरून मतभेद सुरू आहेत. या मुद्द्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, ''जागा वाटपाबाबत आमचे तिन्ही ज्येष्ठ नेते बसून निर्णय घेतील. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेनं जिंकली आहे. त्यामुळे ती शिवसेनेची जागा आहे. माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं ही जागा लढवावी, अशी माझी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे जिथे यापूर्वी शिवसेनेने जागा लढल्या आहेत, त्या जागा आपणच लढल्या पाहिजेत, असेही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं आहे.''

उद्योग मंत्री भावाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट केल्यानंतर नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा जागेवर निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदासंघांतून त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. त्यांनी मागील ३ वर्षांपासून सुरू केली आहे. त्यातच भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी २३ लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पण, यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा समावेश नसल्यानं शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात या जागेवरून अंतर्गत वाद सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा:

  1. आई प्रियकरासोबत तर वडील प्रेयसीसोबत पसार; तीन महिन्यांपासून तीन मुली वाऱ्यावर
  2. वर्धा लोकसभा मतदारसंघ : 'महात्मा गांधींच्या कर्मभूमी'त तिसऱ्यांदा कमळ फुलणार? काय असेल लोकसभेचं समीकरण
  3. डोहाळ जेवण कार्यक्रम आटोपून परतताना पिकअपला भीषण अपघात; 14 जणांचा मृ्त्यू तर 20 गंभीर जखमी
Last Updated :Feb 29, 2024, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.