ETV Bharat / state

आजोबांनी चालवलेली चळवळ लाचार करून संपवू नका - ॲड. प्रकाश आंबेडकर - Adv Prakash Ambedkar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 5:37 PM IST

अॅड. प्रकाश आंबेडकर
अॅड. प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये लोकसभा (Lok Sabha Election 2024) जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तीन पक्षातील जागावाटप पूर्ण झाल्यानंतर आपण जागावाटपाची चर्चा करणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. तर दुसरीकडे आघाडीतील नेत्यांकडून वंचितसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. हे सगळं सुरू असताना आज मंगळवार (दि. 26 मार्च) रोजी प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करत फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील लोकांना आवाहन केलं आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकांचं वारं सध्या सगळीकडे वाहत असताना राजकीय घडामोडींनाही मोठा वेग आला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा आणखी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. तसंच, वंचित बहुजन आघाडी नक्की काय भूमिका घेणार हेसुद्धा आणखी स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे (Mahavikas Aghadi) आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

सहा जागांची मागणी : प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला (दि. 26 मार्च) पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. महाविकास आघाडीने वंचितला राज्यातील चार जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता, जो प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केलेला नाही, असं दिसतंय. वंचितने मविआकडे सहा जागांची मागणी केली असल्याचं बोललं जातय. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या आजोबांचा म्हणजेच दिवंगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मविआला टोला लगावला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर : गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी युतीसंदर्भात त्यांची मतं मांडली. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मला आमच्या कार्यकर्त्यांसह सर्वांना सांगायचं आहे की, माझ्या आजोबांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) यांनी चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती. ही लाचारी मीदेखील मान्य करणार नाही. आघाडीमध्ये अडचण येईल म्हणून आम्ही कोणतेही व्यक्तीगत वाद किंवा हेवेदावे मध्ये येऊ दिले नाहीत. परंतु, जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं, लाचार करून संपवलं जातं, ते आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे मी सर्व शाहू, फुले आणि आंबेडकरी मतदारांना आवाहन करतो की, आपण जिंकलो पाहिजे ही माझी भावना आहे. परंतु, मी आज त्यांना सांगतो की चळवळीचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. मी काही गोष्टी बोलू शकत नाही. परंतु, अनेक ठिकाणी आपण जिंकू अशी परिस्थिती आहे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

विचारांच्या लोकांचा पाठिंबा मिळेल : प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण चळवळीचा अधिक विचार करायला हवा. व्यक्तीगत विचार हे त्या ठराविक व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतात. परंतु, सार्वजनिक जीवनात, सार्वजनिक ठिकाणी सार्वत्रिक निर्णयास मान-सन्मान मिळाला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या लोकांचा पाठिंबा मिळेल असं मी गृहित धरतो. आम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे असंही ते म्हणाले.

4 जागांचा प्रस्ताव : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला असल्याचं सांगितलं होतं. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी त्यांना (ठाकरे गट) त्या चार जागा परत देतो, त्यांनी त्या लढवाव्या. संजय राऊत हे चार जागा म्हणत असले तरी त्यांनी बैठकीला गेल्यानंतर एक अकोला आणि दोन दुसऱ्या जागा, अशा तीन जागा देण्यासंदर्भात सहमती दर्शवली होती. त्यामुळे खोटं बोलणं थांबलं पाहिजे." असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

हेही वाचा :

1 रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर; पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा - NCP candidate list

2 संजय राऊतांच्या निशाण्यावर पुन्हा मोदी-शाह, म्हणाले ईदी अमिन हा नरभक्षक, ते... - Sanjay Raut News

3 कंगणा रणौतवर वादग्रस्त पोस्ट ; सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या 'पोस्ट मी केलीच नाही', भाजपा आक्रमक - Supriya Shrinate On Derogatory post

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.