ETV Bharat / state

'आदरानं गप बसलो म्हणून वळवळ करू नका; मी तोंड उघडलं तर फिरणं मुश्किल होईल,' अजित पवारांचा हल्लाबोल - Ajit Pawar vs Sharad Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 6:51 AM IST

Ajit Pawar vs Sharad Pawar
संपादित छायाचित्र

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. अजित पवार यांनी बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं आहे. त्यामुळे पवार घराण्यात मोठा वाद पेटला आहे. त्यातच आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर बारामतीत हल्लाबोल केला आहे.

पुणे Ajit Pawar vs Sharad Pawar : "माझ्या निवडणुकीत कधी भावंड फिरली नाहीत. आता नुसती गरागरा फिरत आहेत. अरे भाऊ उभा असताना कधी फिरला नाहीत. आता कसं काय फिरताय ? त्यांचं हे फिरणं म्हणजे पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत. एकदा मतदान झालं की या छत्र्या परदेशात हवाई सफर करायला जातील. सगळ्यांना तीच सवय आहे. मी आदरानं तोलून मापून बोलतोय, तोंड उघडायला भाग पाडले तर फिरता येणं मुश्किल होईल. गप बसलोय म्हणून वळवळ करता का ?" या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबातील इतर सदस्यांवर निशाणा साधला.

दमबाजी केली तर लोक मला बांबू लावतील : अजित पवार हे बारामतीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांनी सोमवारी दमबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावरही अजित पवार बोलले. "मी दमबाजी केली तर लोक मला बांबू लावतील. मी दम दिलेला नाही, फार तर मी केलेल्या कामाची त्यांना आठवण करुन दिली असेल, तेवढे तर मी करू शकतो ना.. मी उगाच बोलत नाही. मनात दुखतेय म्हणून बोलतोय," असं सांगत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांवर जोरदार प्रहार केला.

राज्यात तुमची सत्ता येण्याची शक्यता आहे का ?: "मी पक्ष चोरला नाही. एखादं काम पुढच्या पिढीनं हातात घेतलं, तर ती चोरी कशी ?" असा सवाल अजित पवार यांनी केला. "पक्ष चोरला म्हणता मग माझ्याबरोबर 80 टक्के लोक कसे आले? त्यांनीही आपापल्या भागात पक्ष वाढवला होता ना. त्यांना भूमिका पटली म्हणूनच ते माझ्यासोबत आले. आमच्या वरिष्ठांनी सातत्यानं भूमिका बदलली. 2014 ला भाजपाला पाठींबा देवून टाकला. पुन्हा म्हणाले, नाही देणार. 2019 ला पाठींबा देतो म्हणाले, दिला नाही. म्हणजे तुम्ही करता ते सगळे बरोबर, अन् आम्ही केलं की चुकीचं, हे कसं ?" असा सवाल अजित पवार यांनी केला. "आता म्हणतात मी पाण्याचा प्रश्न सोडवणार. कसा सोडवणार ? केंद्रात, राज्यात तुमची सत्ता आहे का? सत्ता येण्याची शक्यता आहे का ? निवडणूक पूर्व सर्व्हेतून केंद्रात मोदी तिसऱयांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं असताना आश्वासनं कशी देता," या शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

खासदारांकडून रेल्वेच्या जमीन अधिग्रहणाचं काम झालं नाही : "बारामतीतील काही लोक केव्हीके ट्रस्टमध्ये कामाला आहेत. त्यांना आता दमबाजी केली जात आहे. या पद्धतीनं बारामतीत कधी मतं मागितली गेली नव्हती. पातळी सोडून हे सगळं चाललंय, असं अजित पवार म्हणाले. संसदेत केवळ भाषणं करुन प्रश्न सुटत नाहीत, मी पण भाषणे करतो पण त्याबरोबर काम करुन जनतेला रिझल्टही देतो. खासदारांकडून रेल्वेच्या जमीन अधिग्रहणाचं एक काम झालं नाही. शेवटी मी अमित शाह यांना भेटून ते मार्गी लावलं."

शिवतारेंना कोणी फोन केले ? : "विजय शिवतारे आमच्यासोबत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याशी त्यांची चर्चा झाली. त्यांनी अर्ज दाखल करावा म्हणून कोणी मध्यरात्रीपर्यंत त्यांना फोन केले, हे शिवतारेंनी मला दाखवले. हे त्यांना माघार घेवू नका, अर्ज दाखल करा, असं सांगत होते. हे कोणत्या पातळीवरचं राजकारण चाललंय ? मी संबंधितांचे फोन बघितल्यावर मला वाईट वाटलं. ज्यांच्यासाठी मी जीवाचं रान केलं त्यांच्याकडून इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात असेल, असं वाटलं नव्हतं," या शब्दात अजित पवार यांनी हल्ला चढवला.

हेही वाचा :

  1. भाजपाबरोबर जाण्यासाठी लोकांनी इतर पक्षांना मतं दिली नव्हती, शरद पवारांचा अजित पवारांना टोला - Sharad Pawar Baramati Visit
  2. पक्षाच्या नावासह चिन्ह गमाविले! लोकसभा निवडणुकीत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वाकरिता संघर्ष - Maharashtra politics
  3. "अंतरिम आदेशाचे पालन करा", सुप्रीम कोर्टाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांना निर्देश! - NCP dispute
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.