ETV Bharat / state

BJP Vs Congress : भाजपाचा 'भारत जोडो न्याय यात्रे'ला शह देण्याचा प्रयत्न, पण आम्ही डगमगत नाही - काँग्रेस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 9:02 PM IST

BJP Vs Congress : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी आणि प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपाने चालवला आहे. यामुळे काँग्रेसला त्या त्या विभागात नामोहरम करण्याचा भाजपाचा प्रयत्न असला तरी आम्ही डगमगत नाही. नेते गेले तरी कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, असा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

Atul Londhe
अतुल लोंढे

कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेविषयी सांगताना किरण नाईक

मुंबई BJP Vs Congress : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते आणि संबंधित विभागातील काही माजी मंत्री यांना भाजपाने आपल्या पार्टीत सामावून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस त्याला अपवाद आहे, असं सांगितलं जात होतं; मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावत भाजपाने काँग्रेसचा हा दावाही फोल ठरवला.

काय आहे भाजपाचा डाव? : यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे जो भाजपाला पूर्ण ताकदीनिशी शह देऊ शकतो. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आमच्यातील काही नाराज तर काही विविध प्रकरणांमध्ये अडकलेल्या नेत्यांना भाजपाने लक्ष्य केले. वास्तविक काँग्रेसलाही कमकुवत करण्याचा भाजपाचा डाव आहे.

काय साधते भाजपा मुहूर्त ? : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चे मुख्य समन्वयक म्हणून काम करत होते. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' यशस्वी होऊ नये किंवा त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू नये म्हणून महाराष्ट्रात ही यात्रा दाखल होण्यापूर्वी त्यांनी अशोक चव्हाण यांनाच दबाव टाकून आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर ही यात्रा मुंबईत येईल आणि महाराष्ट्रातील मुंबईतील जनता निश्चितच त्यांचे स्वागत करील ही भीती असल्यानं त्यांनी मुंबईतील माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांना आपल्या पक्षात घेतले.

भाजपाला योग्य तो जबाब देऊ : मुंबईचे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम हेसुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत असे विचारले असता लोंढे म्हणाले की, "कुणीही कुणाचीही भेट घेऊ शकतो; परंतु संजय निरुपम हे भाजपात जातील असं मला सध्या तरी वाटत नाही. तसेच राहुल गांधी यांची यात्रा नंदुरबार येथे आल्यानंतर त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार याची खात्रीच होती. म्हणून त्याला काही अंशी छेद देण्यासाठी आमचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांना त्यांनी पक्षात घाईघाईने घेतले आहे. परंतु, काही डागाळलेले नेते आणि काही निष्क्रिय नेते त्यांनी आपल्या पक्षात घेतले असले तरी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला काहीही फरक पडत नाही. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. नेते गेले म्हणून कार्यकर्ते गेले नाहीत. ते आमच्या सोबत कायम आहेत. त्यामुळे काँग्रेस काहीही झाले तरी डगमगणार नाही. भाजपाला योग्य तो जबाब देईलच," असा इशाराही लोंढे यांनी दिला.


'हे' नेते गेले भाजपात : काँग्रेस मधून गेल्या काही काळामध्ये भाजपात राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, रणजीत सिंह, नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, कृपाशंकर सिंग, सत्यजित तांबे, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, अशोक चव्हाण आणि पद्माकर वळवी यांनी प्रवेश केला आहे. आणखी काही नेते भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

राहुल गांधी हे पणवती- आमदार कदम : राहुल गांधी हे पनवती आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाचे अध:पतन होत आहे, अशा शब्दात भाजपाचे आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. राहुल गांधी जिथे पाय टाकतील तिथले लोक सोडून जात आहेत. त्यांचा पाय हा अपशकुनी आहे. त्यामुळे भारत जोडो ही केवळ नौटंकी आहे. ज्या नेत्याला आपला पक्ष जोडून ठेवता येत नाही, तो काय भारत जोडणार? भारत आधीच जोडलेला आणि एकसंघ आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा धसका घेऊ नये. तर त्यांच्या पक्षात काही शिल्लक नाही, म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार कदम यांनी दिली.


भाजपाने घेतला गांधींच्या यात्रेचा धसका : राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा भाजपाने चांगलाच धसका घेतला आहे. म्हणूनच त्यांनी ज्या भागातून ही यात्रा जाते त्या भागातील नेते आपल्या पक्षात सामील करण्याचा सपाटा लावला आहे. आधी अशोक चव्हाण यांना त्यांनी पक्षात घेतले आणि त्यानंतर आता माजी मंत्री पद्माकर वळवी यांना पक्षात सामावून घेतले आहे. हिना गावित यांना फटका बसू नये यामुळेच त्यांनी वळवी यांना पक्षात सामील करून घेतल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक यांनी व्यक्त केले.

हेही वाचा:

  1. आमदार निलेश लंकेंच्या हाती 'तुतारी'; अजित पवार गटाला मोठा धक्का
  2. Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आध्यात्मिक आघाडी सरसावली; घेणार साधू महंतांच्या भेटी
  3. Supreme Court : शरद पवारांच्या नावासह फोटोचा गैरवापर, सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला दिले 'हे' निर्देश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.