ETV Bharat / state

'अटल सेतू'नंतर मुंबईकरांना मिळणार 'कोस्टल रोड'चं गिफ्ट; उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 10:43 PM IST

Coastal Road Inauguration
Coastal Road Inauguration

Coastal Road Inauguration : मुंबईच्या महत्त्वकांक्षी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 19 फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे. पहिल्या टप्प्यात वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमिटर रस्त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. मात्र, यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

मुंबई Coastal Road Inauguration : मुंबईच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्यात वरळी ते मरीन ड्राईव्ह या 10 किलोमिटर रस्त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. तसंच 15 मेपर्यंत दोन्ही टप्पे सुरु होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

दोन भागांत विभागला प्रकल्प : मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेल्या या रोडमुळं मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेलाय. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे या रोडचे दोन भाग आहेत. यात दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलंय. हा कोस्टल रोड प्रकल्प मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे. हा मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरु होतो, तो वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.

कसा असेल कोस्टल रोड : या कोस्टल रोडच्या सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी तब्बल 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसंच या कोस्टल रोड प्रकल्पात तीन इंटरचेंज आहेत. या इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. यात 1600 वाहनं पार्क केले जातील. हा संपूर्ण कोस्टल रोड आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. सध्या मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचं अंतर कापायला एक तास लागतो. या कोस्टल रोड प्रकल्पामुळं हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होईल.

उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंची टीका : कोस्टल रोड प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. त्यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी म्हटलंय की, "कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै 2013 मध्ये मांडला. त्यानंतर ह्या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु केला. 2017-18 मध्ये या कामाला सुरुवात झाली. 2022 पर्यंत या प्रकल्पाचं 65 टक्के काम पूर्ण झालं होतं. कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणंघेणं नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचं उद्घाटन करुन निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरु करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱ्यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जातोय. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे", असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केलीय.

हेही वाचा :

  1. Mumbai Coastal Road Project: 'या' कारणामुळे चुकली कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याच्या पूर्णत्वाची डेडलाईन; एप्रिल महिन्यात होईल पूर्ण
  2. Coastal Road Project : कोस्टल रोड प्रकल्प 6 महिन्यांसाठी लांबणीवर; दोन पिलरमधील अंतर वाढवण्याचा निर्णय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.