ETV Bharat / state

रोटी, कपडा आणि मकान देणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 6:52 PM IST

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदे

CM Shinde On Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या बजेटवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रतिक्रिया येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजेटवर प्रतिक्रिया देत, बजेटमध्ये सर्व घटकांचा समावेश केला असल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया

मुंबई CM Shinde On Budget 2024 : अर्थसंकल्पाबाबत पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशात गेल्या 50-60 वर्षांत जे निर्णय झाले नाहीत ते मागील मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात झाले आहेत आणि आता ते अर्थसंकल्पात दिसून येत आहेत. (Budget 2024) मोदी सरकारची कामाची पद्धत आणि सरकारने घेतलेले निर्णय त्याचे फलित अर्थसंकल्पातून दिसत आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, तरुण आणि गोर-गरीब यांचा विचार करण्यात आला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण : मोदी सरकारनं आपल्या सरकारच्या काळात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. दारिद्र्य रेषेखालील 25 हजार कोटीपेक्षा अधिक गोरगरिबांना दारिद्र्यरेषेखालून मोदी सरकारनं बाहेर काढलं आहे. तसंच महिलांसाठी आरोग्य विभागात देखील महत्त्वपूर्ण निर्णय बजेटमध्ये घेण्यात आले आहेत. त्यामुळं हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आणि अतिशय चांगला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


रोटी, कपडा आणि मकान देणारा अर्थसंकल्प : पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या अर्थसंकल्पात महिलांबरोबर लहान मुलींसाठीही महत्त्वपूर्ण योजना आणण्याचा सरकारचा विचार आहे. महिलांसाठी लखपती योजना किंवा आर्थिक बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात दिसताहेत. याच बरोबर कोविड काळात 80 कोटी गरिबांना धान्य वाटप केले. पंतप्रधान आवास योजनेमार्फत 2 कोटी नवीन घरांची मोदी सरकारच्या काळात निर्मिती करण्यात आली. आता याच पंतप्रधान आवास योजनेमध्ये आणखी घरांची निर्मिती होणार आहे. थोडक्यात काय तर सर्व घटकांचा विचार करून, मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे रोटी, कपडा आणि मकान आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.


तरुणांसाठी केंद्राचा पुढाकार : बजेटमध्ये कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. तसंच स्टार्टअप इंडिया, स्किल डेव्हलपमेंट आदी बाबींचा विचार करण्यात आला आहे. युवकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी सरकारकडून कर्ज देण्यात येणार आहे. ही एक महत्त्वाची बाब म्हणावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. अंगणवाडी सेविका यांचा देखील अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. पायाभूत सुविधावर मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. याचे परिणाम आगामी काळात दिसतील, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अर्थसंकल्पाचं आणि मोदी सरकारचं कौतुक केलं.


विकसित भारताकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प : या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्व घटकांचा समावेश केला आहे आणि सर्व घटकांना न्याय देण्यात आला आहे. यामध्ये महिला, तरुण, शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, कामगार, ज्येष्ठ आणि विद्यार्थी या सर्वांचा विचार करून सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात विकसित भारताकडे आपण वाटचाल करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:

  1. शेतकरी, ग्रामीण विभाग तसंच बेरोजगार तरुणांची घोर उपेक्षा करणारा अर्थसंकल्प - डॉ अजित नवले
  2. सरकार दहा वर्षे झोपलं होतं का? अर्थसंकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
  3. अर्थसंकल्प 2024 : देशातील 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट मिळणार मोफत वीज, निर्मला सीतारामन यांची घोषणा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.