ETV Bharat / state

तर ठरलंय! दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपा लढणार; ठाण्यात शिंदे गटानं थोपटले दंड - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 4:07 PM IST

South Mumbai Seat
दक्षिण मुंबई सीट

South Mumbai Seat : गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाचा महायुतीमधील संघर्ष अजूनही संपलेला नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा भाजपाला सोडल्यानंतर आता ठाण्याची जागा शिवसेनेला देऊन दक्षिण मुंबईची जागा ही भाजपाला सोडण्याचे संकेत दिले जात आहेत; मात्र याबाबतीत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे दोन्ही पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबई South Mumbai Seat : महायुती मधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाही. केंद्रीय नेतृत्वाच्या मनधरणीनंतर अखेर सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा भाजपाला शिवसेनेने सोडली आणि किरण सामंत यांनी माघार घेतली. मात्र आता उर्वरित नाशिक, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा दक्षिण मुंबईचा मतदारसंघ आता शिवसेने ऐवजी भाजपा लढणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे आणि कल्याण पैकी एक जागा भाजपाला द्यावी यासाठी भाजपा आग्रही असताना शिवसेना शिंदे गट हे मुख्यमंत्री ठाणे मतदार संघातील असल्यामुळे ठाणे शिवसेनेकडे असायलाच हवा यावर ठाम आहेत. त्यामुळे या जागांची अदलाबदल होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.


जागा वाटपात आमच्याकडे लवचिकता- उपाध्ये : भाजपा आणि शिवसेना शिंदे गट किंवा महायुतीतच जागा वाटपाबाबत अत्यंत लवचिकता आहे. कोणताही पक्ष ताणून धरत नाही. म्हणूनच किरण सामंत यांनी माघार घेतली आहे आणि नारायण राणे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आता अन्य मतदार संघांमध्येसुद्धा सामंजस्याने आणि जिंकून येण्याच्या निकषावर आम्ही उमेदवारी देणार आहोत. त्यासाठी जागांची अदलाबदल किंवा उमेदवारांची अदलाबदल काहीही शक्य आहे. यात मात्र याबाबतीतला अंतिम निर्णय हे पक्षश्रेष्ठीच घेतील आणि तो निर्णय लवकरच होईल. ठाणे असो किंवा दक्षिण मुंबई भाजपाची कुठूनही निवडणूक लढवायची तयारी आहे, असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं.

अंतिम निर्णय शिंदे यांचा- वाघमारे : या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले की, ठाणे हा आमचा 1995 पासूनचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे तो सोडण्याचा प्रश्न येत नाही. त्यासाठी आम्ही आग्रही आहोतच. मात्र, त्या बदल्यात दक्षिण मुंबईची जागा सोडावी असा भाजपाकडून प्रस्ताव आला असल्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. दक्षिण मुंबईसुद्धा आमचा बालेकिल्ला आहे; मात्र निवडून येणारा उमेदवार आणि जिंकून येण्याची क्षमता हेच आमचे निकष आहेत. त्यामुळे त्या निकषाचा विचार करून जर जागांची अदलाबदल किंवा अन्य काही प्रस्तावावर विचार झाला तर त्याप्रमाणे अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील; परंतु अखेरीस जिंकून येण्याची क्षमता याच निकषावर आम्ही विचार करणार आहोत. त्या दृष्टीनेच निर्णय घेतला जाईल, असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सोडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा :

  1. डॉ. आंबेडकरांसारख्या दिग्गजांचा झाला होता पराभव, काय आहे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचं गणित? - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान - Lok Sabha Election 2024 Live Update
  3. काय सांगता! ज्यांच्याविरुद्ध लढा, त्यांच्याकडूनच घेतलंय 55 लाखांचं कर्ज, सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.