ETV Bharat / state

"इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?", भाजपा आमदाराच्या गोळीबारावरून विरोधक आक्रमक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 8:33 AM IST

Updated : Feb 3, 2024, 2:21 PM IST

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

BJP MLA Firing : उल्हासनगरमध्ये भाजपा आमदारानं शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर चांगलंच तोडसूख घेतलं.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

मुंबई BJP MLA Firing : कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उल्हासनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विजय वडेट्टीवारांचा सवाल : सत्ताधारी पक्षांतील दोन नेत्यांमध्ये झालेल्या या घटनेवरून आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'X' वर पोस्ट करत घटनेची निंदा केली. "इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?", असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. "गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला आपला महाराष्ट्र कधी नव्हता", अशी शब्दांत त्यांनी टीका केली.

यांचे बॉस 'सागर' आणि 'वर्षा' बंगल्यावर : "सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचं नाव घेत नाही. भाजपावाल्यांचे बॉस 'सागर' बंगल्यावर आणि शिंदे गटाचे 'बॉस' वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे", असा हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केला.

ठाकरे गटाची टीका : झालेल्या घटनेवर शिवसेना ठाकरे गटानंही प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना या घटनेची दखल घेण्याची मागणी केली. "महाराष्ट्रात चाललंय तरी काय? भाजपा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार केला. ज्याला गोळी लागली तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे. या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही हे आपण समजायचं का? राज्य सरकारची दोन्ही इंजिनं निकामी झाली आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घ्यावी", असं आनंद दुबे म्हणाले.

अशोक चव्हाणांचे ताशेरे : या घटनेनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी 'X' वर पोस्ट करत सरकारवर ताशेरे ओढले. "उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदारांनी बेछूट गोळीबार करण्याची घटना अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. हे केवळ कायदा व सुव्यवस्थेला आव्हान नाही, तर राज्य सरकारच्या न्यायदानाच्या कर्तव्यावर आणि विश्वासार्हतेवर लागलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे", असं अशोक चव्हाण म्हणाले.

सीएमओ गुंडांचा अड्डा बनलंय : या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृहनगरीत गोळीबाराची घटना घडली आहे. आमदार उघडपणे म्हणतात की शिंदे यांनी मला गोळ्या घालण्यास भाग पाडलं आणि त्यांनी राजीनामा द्यावा. आज हे पोलिस स्टेशनमध्ये घडलं. मुख्यमंत्री कार्यालय ज्या पद्धतीनं गुंडांचा अड्डा बनलंय, मला भीती वाटते की अशा घटना मंत्रालय आणि सीएमओमध्येही घडू शकतात."

गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि केंद्र सरकारनं राज्य सरकार बरखास्त करावं", अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

हे वाचलंत का :

  1. भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उल्हासनगरमधील थरारक घटना
  2. उल्हासनगर गोळीबार प्रकरण, फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
  3. 'आत्मरक्षणासाठी केला गोळीबार, मुख्यमंत्र्यांनी राज्यभर गुन्हेगार पाळून ठेवले'; गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप
Last Updated :Feb 3, 2024, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.