ETV Bharat / state

भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली विचारपूस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 1:03 PM IST

भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली विचारपूस
भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली विचारपूस

Food Poisoning : परळी तालुक्यातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यांना अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Food Poisoning

परळी (बीड) Food Poisoning : परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. ही बातमी समजताच धनंजय मुंडे यांनी आपला परळीच्या दिशेनं निघालेला ताफा थेट अंबाजोगाईकडे वळवत, स्वारातीमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या चौकशीसाठी मध्यरात्री येऊन भेट देत विचारपूस केली.

चौकशी करण्याचे निर्देश : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन निरपणा गावातील अन्नातून विषबाधा झालेल्या सर्वच रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना धीर दिला. तसंच त्यांच्यावर तातडीनं योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. सदर रुग्णांना भगरीतून विषबाधा झाल्यानं याबाबत योग्य चौकशी करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी अन्न भेसळ व सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

35 जणांना विषबाधा : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात भगरीतून विषबाधा झालेल्या 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाशिवरात्री निमित्तानं उपवासासाठी आणलेली भगर खाल्ल्यानं मळमळ आणि उलटी होत असलेल्या 35 जणांना तातडीनं रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं. निरपना, चनई, मगरवाडी आणि अंबाजोगाई शहरातील रुग्णांचा समावेश असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. धपाटे यांनी दिली.

गेवराईतही तिघांना विषबाधा : गेवराई शहरातही काल शास्त्री चौकातील एका किराणा दुकानातून नागरिकांनी भगरीचं पीठ खरेदी केलं होतं. हे भगरीचं पीठ खाल्ल्यानं गेवराई शहरातील 3 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळं त्यांना मळमळ उलट्या पोटदुखी हातपाय दुखणे डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. त्या 3 जणांना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. दिवसेंदिवस या घटनांमुळं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतोय. आपण खात असलेले उपवासाचे पदार्थ चांगल्या परिस्थितीत आहेत का ते झाकून ठेवलेले आहेत का ते स्वच्छ करूनच खावेत असं आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येतंय.

हेही वाचा :

  1. अहमदनगरमध्ये खळबळ; हळदीच्या कार्यक्रमात दोनशेहून अधिक लोकांना विषबाधा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.