ETV Bharat / state

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पालिकेचा जलसाठा आला निम्म्यावर, आजपासून पाणीकपात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 8:04 AM IST

Mumbai Water Cut
पाणी कपात

Mumbai Water Cut : राज्यात यंदा मॉन्सूननं सरासरी गाठली नाही. त्यामुळं आता मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट आलंय. मुंबईत 27 फेब्रुवारी ते 11 मार्च याकाळात 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. मुंबईची तहान भागविणाऱ्या सातही धरणात केवळ 45.00 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबई Mumbai Water Cut : मुंबईतील हजारो घरांमध्ये 10 दिवस पाणीकपात होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मंगळवारपासून 10 टक्के पाणी कपात जाहीर केलीय. पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळं मंगळवारी 27 फेब्रुवारीपासून शहरातील विविध भागात पाणीकपात होणार असल्याची माहिती, पालिकेनं दिलीय.

या कालावधीत होणार पाणी कपात : पालिकेच्या माहितीनुसार, पाली हिल जलाशयात पुनर्वसनाचं काम केलं जाणार असल्यानं, 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत वांद्रे आणि खार पश्चिम येथील काही भागात 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. सध्या 14 दिवस होणारी पाणी कपात डागडुजीच्या कामासाठी असली तरी येत्या काळात मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या झळा सोसाव्या लागतात की? काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.

44 टक्केच पाणीसाठा शिल्लक : मुंबईकरांवर अशी परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे ती म्हणजे पालिकेकडं असलेल्या अपुऱ्या जलासाठ्यामुळं. याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मुंबईच्या मध्य वैतरणा धरणात 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व 7 धरणात मिळून फक्त 44 टक्केच पाणीसाठा आता शिल्लक आहे. भातसा धरणातील राखीव जलसाठ्यातील पाणी मिळवण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मात्र, भातसा धरणातील पाणी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात भातसा धरणातून पाणी न मिळाल्यास पालिकेकडून पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.


शहराला रोज 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा : उन्हाळ्यातील संभाव्य पाणी कपातीसाठी पालिकेकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याबाबत निर्णय होणं बाकी आहे. आज घडीला मोडक सागर, मध्यवैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी धरणातून मुंबई शहराला रोज 3950 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातोय. या सातही धरणात 6 लाख 53 हजार सहा दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या साठ्यामुळं जुलैपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल. त्यामुळं पालिकेनं राज्य सरकारकडं अप्पर वैतरणा धरणातून 93 हजार 500 दशलक्ष लिटर तर, भातसा धरणातून 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर राखीव पाणी साठ्याची मागणी केलीय. आता राज्य सरकारनं ही मागणी मान्य करून पालिकेला राखीव पाणी दिल्यास ऑगस्ट महिनापर्यंत मुंबईकरांची तहान भागेल असा पालिकेचा अंदाज आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील शिल्लक पाणीसाठा : पालिकेने 25 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अप्पर वैतरणा धरणात 1 लाख 65 हजार 199 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर धरणात 45 हजार 608 दशलक्ष लिटर, तानसा धरणात 1 लाख 45 हजार 80 दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा धरणात 1 लाख 93 हजार 530 दशलक्ष लिटर, विहार जलाशयात 27 हजार 698 दशलक्ष लिटर, तुलसी जलाशयात 8 हजार 46 दशलक्ष लिटर, तर भातसा धरणात 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. आता या सात धरणांचा एकूण पाणीसाठा 6 लाख 48 हजार 535 दशलक्ष लिटर होतो. तर 2023 ची 2022 सोबत तुलना केल्यास 25 फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईच्या सात जलाशयांमध्ये एकूण 7 लाख 21 हजार 57 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. तर 25 फेब्रुवारी 2022 मध्ये 7 लाख 57 हजार 448 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक होता.

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांची तहान कशी भागवार? : मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी प्रचंड खालावल्यानं ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांची तहान कशी भागवायची या चिंतेत पालिका प्रशासन आहे. यावर्षी पालिकेच्या जलसाठ्यात इतक्या मोठ्या प्रमाणात घट होण्याचं कारण म्हणजे धरण क्षेत्रातील वाढते बाष्पीभवन असल्याचं पालिकेच्या प्रशासनाचं म्हणणं आहे. तर, राखीव पाणी साठा मिळावा यासाठी राज्य सरकारसोबत पालिकेनं पत्रव्यवहार केलाय. यावर अद्याप राज्य सरकारनं कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळं आगामी काळात 10 टक्के पाणी कपात करण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चौहान यांनी दिलीय.



पाणी जपून वापरावं : संभाव्य परिस्थिती पाहता पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता पालिका पावलं उचलणार आहे. नागरिकांनी देखील पाणी जपून वापरावं यासाठी लवकरच जनजागृती कार्यक्रम पालिका हाती घेणार असल्याची माहिती, प्रशासनाकडून देण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी खुशखबर! बीएमसीकडून आजपासून १० टक्के पाणीकपात रद्द
  2. Water Supply Cut In Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ३ दिवस होणार १० टक्के पाणी कपात
  3. Mumbai Water Cut: ऐन उन्हाळ्यात मुंबईसह ठाण्यात महिनाभर होणार 15 टक्के पाणीकपात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.