ETV Bharat / politics

जागा वाटपावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील - शंभूराज देसाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 4:12 PM IST

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलीय. लोकसभा मतदारसंघ आपल्याच पक्षाच्या पदरात पडावा, यासाठी सर्व पक्षांनी आटापिटा सुरू केला असून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. महायुतीतील अनेक जागांवर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद समोर येऊ लागला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही जागांवरील दावा सोडण्यास नकार दिलाय. कोणकोणत्या जागांवरून तिढा वाढतो आहे, जाणून घेऊया.

Maharashtra Politics
महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

प्रतिक्रिया देताना मंत्री शंभूराज देसाई

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी आता सर्व पक्षांच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यावर आलेली आहेत. आचारसंहिता केव्हाही जाहीर होईल, अशी परिस्थिती असताना सर्वच पक्षांनी आता आपापल्या परंपरागत मतदारसंघावर दावा ठोकायला सुरुवात केलीय. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. मात्र या जागा महायुती म्हणून जिंकणार की, भारतीय जनता पार्टी म्हणून याबाबत अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमात आहेत. महायुतीतील घटक पक्षांनी आपापल्या परंपरागत मतदार संघांवर दावा ठोकल्यानं भारतीय जनता पक्ष ही या मतदार संघासाठी आग्रही आहे. त्यामुळं महायुतीमध्ये आता जागा वाटपावरून तणाव वाढू लागला आहे.



कोणकोणत्या जागांवरून तणाव : महायुतीमधील घटक पक्षाकडं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडं रायगडची जागा आहे. सुनील तटकरे येथे विद्यमान खासदार आहेत. मात्र भारतीय जनता पक्षानं या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये या जागेवरून तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडं सध्या कोल्हापूर, हातकणंगले, या जागा आहेत. त्याचसोबत अन्य 11 जागा ही शिंदे गटाकडं आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं पाच खासदार आहेत. मात्र महायुतीत शिंदे गटाकडं असलेल्या बहुतांश जागांवर भाजपाने दावा सांगितला आहे.

जागांवरून आता युतीमध्ये तणाव : भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर, हातकणंगले, रामटेक शिरूर, मावळ या जागांवर दावा केला आहे. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा सांगत आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघांवर ही भाजपाने आता दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगरातून भारतीय जनता पार्टीने भागवत कराड यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे. तर दुसरीकडं शिंदे गटाच्या वतीनं संदिपान भुमरे हे संभाव्य उमेदवार आहेत. हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत. तर या जागेवर आता भारतीय जनता पक्षानेही दावा केला आहे. त्यामुळं या जागांवरून आता युतीमध्ये तणाव वाढू लागला आहे. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर निवडणूक लढवण्यास तयार असताना, या जागेवर भाजपाच्याच मोहिते पाटील यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळं आता माढ्याचा प्रश्नही भाजपासाठी चिंतेचा ठरणार आहे.


आमचे वरिष्ठ निर्णय घेतील : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं जिथे आमचे आमदार निवडून आले आहेत. त्या जागांवर यापूर्वीच मागणी केली आहे. आणखी काही जागांवरही आम्ही लढू शकतो. त्यामुळ या संदर्भात तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. प्रत्येक पक्षानं आपापली ताकद आजमावण्यासाठी जागांवरती सध्या जरी दावा केला असला तरी, प्रत्यक्षात वरिष्ठ निर्णय घेतील. त्यामुळं हा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो असं देसाई म्हणाले.


जिंकून येण्याची क्षमता हाच निकष : याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके म्हणाले की, सध्या जागा वाटपाबाबत आमची बोलणी सुरू आहेत. ज्या पक्षाची ज्या मतदार संघामध्ये जास्त ताकद असेल त्या पक्षाला ती जागा देण्याचा प्राथमिक निर्णय झाला आहे. महायुतीचे लक्ष आहे 45 पेक्षा अधिक जागा जिंकणं. त्यासाठी आवश्यक तो बदल करायला आम्ही महायुती म्हणून तयार आहोत. आमच्या आणि आमच्या मित्र पक्षांच्या जागा जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी एकत्र बसून निर्णय घेतला जाणार आहे. ज्या मतदारसंघांमध्ये ज्या उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता आहे त्यालाच उभे केलं जाईल. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर मित्र पक्षांच्या उमेदवारांना उभे करण्याचा कुठलाही मानस नाही. जो तो उमेदवार आपापल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल. काही जागांबाबत सध्या जरी वाद असला तरी तो वाद संपुष्टात येईल असा दावा हाके यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. "महात्मा फुले यांनी ब्रिटिशांच्या दरबारी जाऊनच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, पण आता..."- संजय राऊत
  2. नागपूर विमानतळावर पंतप्रधान मोदींनी केली कार्यकर्त्यांची विचारपूस; कार्यकर्ते म्हणाले,...
  3. 'रासप'ला महायुतीच्या बैठकीत निमंत्रण नाही; महादेव जानकर वेगळ्या विचारात?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.