ETV Bharat / politics

पंतप्रधान मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं-संजय राऊत - Sanjay Raut news today

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 2:00 PM IST

Updated : Mar 21, 2024, 2:20 PM IST

मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावे; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावे; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर आज पुन्हा एकदा टीका केलीय. मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावे, अशा शब्दात खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुंबई Sanjay Raut News: शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलंय. ते म्हणाले, " पंतप्रधान मोदींनी सतत रडत राहू नये. भाजपावाले म्हणत आहेत की गरीब जनतेकडून मोदींना आशीर्वाद मिळत आहे. पण तुम्हाला या निवडणुकीत कळेल की, गरीब जनता ईव्हीएमला शिव्या देत आहे. ईव्हीएमला शिव्या देणं म्हणजे भाजपाला शिव्या देणं असं आहे."

मोदींची तुलना औरंगजेबाशी नाही : कालच्या आपल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे भाषण चांगल्या पद्धतीनं ऐकत आहेत. आमची राष्ट्रभक्तीची डिक्शनरी आहे. त्यांची स्वार्थाची डिक्शनरी आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब असं म्हटलं नाही. अथवा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबशी केली नाही. मी जे काल म्हटलं होतं, त्याचा चुकीचा विपर्यास काढला गेलाय. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. मी कुठंही मोदींना औरंगजेब असं संबोधलं नाही. अथवा मोदींची तुलना औरंगजेबाशी केलेली नाही. संपूर्ण भाषण ऐका. त्यातील फक्त दोन-चार वाक्य उचलून आम्ही मोदींची तुलना औरंगजेबशी केली असा आरोप केला जात आहे. तो चुकीचा आहे."


जागा वाटपाचा तिढा सुटेल : महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत संजय राऊत म्हणाले, "काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष येऊन एकत्र येऊन 'इंडिया' आघाडी झालीय. आम्ही त्यांना राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड इथं जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील जागा मागत आहे. भिवंडीबाबत आम्ही सगळे एकत्र आलो तर ती जागा आम्ही भाजपाकडून काढून घेऊ. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघंही भिंवडी जागेबाबत दावा करत आहे. मात्र या जागेवरीलही तिढा सुटेल."


राजू शेट्टींशी चर्चा सुरू : पुढे खासदार राऊत म्हणाले, " आज सकाळीच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मी आमचे काही प्रमुख लोक कोल्हापूरकडे रवाना होणार आहोत. छत्रपती शाहू महाराज यांना भेटू त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचे आशीर्वाद घेऊ. वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकाकडे जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यानंतर सांगली जिल्ह्यात मिरज इथं सभा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा आम्हाला असावी. अशी आमची इच्छा आहे. आम्ही नक्कीच त्या जागेवर ठाम आहोत. राजू शेट्टी यांच्याशीदेखील चर्चा सुरू आहे," असं राऊत म्हणाले.

वंचितची भूमिका वेगळी दिसतेय : वंचितच्या जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. त्याबाबत खासदार राऊत म्हणाले, "वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेच. त्यांच्याशी अनेकवेळा आमची चर्चा झाली. त्यांनी चार जागेवरती लढावं असं आम्ही सांगितलंय. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. हुकूमशाही विरोधात लढाई सुरू आहे. संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळं गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळालं असतं. आम्हाला अजूनही खात्री आहे की, मविआतील सर्व प्रमुख नेते पुन्हा एकत्र बसतील. हे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित आमच्यासोबत असावी," अशी आमची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. PM Narendra Modi: 'त्यांनी मला 104 वेळा अपशब्द वापरले, पण...'; संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर - Lok Sabha Elections 2024
  2. Lok Sabha Elections 2024: ...म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचा सन्मान करतो, आम्हालाही उत्तर देता येतं; प्रतापराव जाधवांचा थेट इशारा
Last Updated :Mar 21, 2024, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.