ETV Bharat / politics

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष 'नमो निर्माण' पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला - Lok Sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 12:03 PM IST

sanjay raut criticizes  raj thackeray
sanjay raut criticizes raj thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात बिनशर्त महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. विरोधकांनी राज ठाकरे यांच्या निर्णयावर टीका केली आहे. कोणती फाईल उघडल्यामुळे राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिला आहे, असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. खासदार राऊत म्हणाले, " जे खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे, त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देतोय. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला, हे त्यांनी सांगावं ?

खासदार संजय राऊत म्हणाले, "आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढत आहोत. आम्ही मोदी आणि शाहा यांच्याशी लढत आहोत. आम्ही स्वार्थासाठी कधीही भाजपासोबत राहिलो नाही. भाजपानं जेव्हा खरे दात दाखवायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो. आम्ही स्वतंत्र राहिलो. आजही आमची महाराष्ट्रासंदर्भात भूमिका स्पष्ट आहे.

भाजपानं व्याभिचारींना घेतलं का? पुढे खासदार राऊत म्हणाले, " राजकीय व्याभीचारी कशाला म्हणतात? ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून समजून घेतले पाहिजेत. ते (राज ठाकरे) प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत. राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते आणि व्यभीचारी यांना भाजपानं घेतलं आहे. त्यातील हे एक आहेत. अजित पवार आणि हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत. त्यांनी बिनशर्त भाजपासोबत जायचं मान्य केलं. ते का गेले? कोणाच्या दबावामुळे गेले, हे सर्वांना माहीत आहे. मला असं वाटत नाही, त्यांचं असं झालं असेल. त्यांच्या अनेक फाइली उघडल्यानं शरणागती पत्करली का? मला असं वाटतं व्याभीचार हा भाजपचा जगजाहीर आहे. अशा व्याभीचारी पक्षाबरोबर कोणी संबंध ठेवत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे."

महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज- "आपली स्वतःची चोरी कशी काय होऊ देऊ शकतो. ठाकरे हे असं नाव आहे, त्यांना कोणी झुकवू शकत नाही. उद्धव ठाकरेंना झुकविण्याचा प्रयत्न झाला. ते झुकले नाहीत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न होऊनही तुटलो नाही. त्यांच्याशी लढतो आहोत. महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं ते सेम आहे. हे 'शेम शेम' आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही निर्णय झालेला दिसत नाही. अमित शाह आणि मोदींविरोधात कुठलाही नेता ठामपणे उभा राहील, असं दिसत नाही," असेही खासदार राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा-

  1. जागावाटपावरुन महाविकास आघाडीत नाराजीनाट्य; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024
  2. सांगलीच्या जागेवर ठाकरे सेनेचाच उमेदवार असेल, संजय राऊतांचा पुर्नउच्चार - Sangli Lok Sabha candidate
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.