ETV Bharat / politics

शिंदे गॅंगमध्ये आता 'गॅंगवॉर' सुरू; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 4:10 PM IST

Sanjay Raut On CM Eknath Shinde : विधिमंडळातील धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमकीचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळात दिसून आले. आता खासदार संजय राऊत यांनी पण याप्रकरणी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut On CM Eknath Shinde
संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई Sanjay Raut On CM Eknath Shinde : शुक्रवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. पण शेवटच्या दिवशी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Dada Bhuse Mahendra Thorave Fight) यांच्यात शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झालीय. यावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आवाज उठवला. या मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावत, आता शिंदे गॅंगमध्ये गँगवॉर सुरू झाल्याचं म्हटलंय. ते मुंबई बोलत होते.



हे एक प्रकारचं गॅंगवॉर : शुक्रवारी विधिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये जी काही भानगड झाली त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा एक प्रकारचा 'गॅंगवॉर' आहे. हा शिंदे गॅंगमध्ये असलेला गॅंगवॉर आहे. ज्यानी मुंबईचा अंडरवर्ल्ड बघितला आहे, तो आम्ही सुद्धा पाहिला आहे. तर तेव्हा ज्या गॅंग होत्या त्या गॅंगमध्ये गॅंगवॉर व्हायचं आणि तीच लोक एकमेकांच्या विरोधामध्ये लढायची.

विकासाची व्याख्या बदलायला हवी : शिंदे गॅंगमध्ये सुद्धा आता त्याच पद्धतीचं गॅंगवॉर सुरू आहे. एक मंत्री आणि एक आमदार विधानसभेमध्ये मारामारी करतात. एक दुसऱ्यांना शिव्या देतात आणि फडवणीस म्हणतात, सर्व ठीक आहे. हाच आमचा विकास आहे का? असं असेल तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. आरएसएसला मी पत्र लिहिणार आहे. महाराष्ट्र मध्ये जे गॅंगवॉर सुरू आहे, त्याला जर तुमचे लोक विकास म्हणत असतील तर विकासाची व्याख्या तुम्ही बदलायला हवी, असंही राऊत यांनी म्हटलंय.



हाच तुमचा विकास आहे का : संजय राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी म्हणतात अजित पवारांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केलाय. तसंच आदर्श स्कॅम हा यूपीएचा देशातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मोदी हे भ्रष्टाचाराबद्दल बरच काही सांगतात. परंतु या सर्व भ्रष्टाचारी लोकांना एकत्र घेऊन मोदी देश चालवत आहेत हा देशाचा विकास आहे. मला फडवणीसांना हेच विचारायचं आहे की, हाच तुमचा विकास आहे का? ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, २५ हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा याबाबत जर देशामध्ये सर्वात जास्त आवाज कोणी उठवला असेल, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उठवला होता.

भ्रष्टाचारी लोकांच्या साथीनं भ्रष्टाचार संपवा : अजित पवार यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवलं. याचा अर्थ तुमच्या सरकारमध्ये जे विरोधक आहेत त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून त्यांच्यावर तुम्ही दबाव टाकत आहेत. अजित पवार हे त्याचं उदाहरण आहे. उद्या आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना सुद्धा क्लीन चीट मिळेल. आदर्श घोटाळा झालाच नाही असं मोदी घोषित करतील. देशाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची त्यांची हीच पद्धत आहे. त्यांनी भ्रष्टाचारी लोकांनाच आपल्या पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.



प्रकाश आंबेडकर परिवर्तनाची गरज : महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपावरून मतभेद सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा सामील होणार आहेत. जर कोणाला वाटत असेल की, महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे, मतभेद आहेत, तसं काहीच नाही. प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाणार आहे.

...तर सामान्य माणसाच्या घरावर धाडी पडतील : देशाच्या परिवर्तनामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे मोठं योगदान असणार आहे. प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते लोकशाही आणि संविधानाचे प्रमुख चौकीदार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी जे वक्तव्य केलंय ते सत्य आहे. पुन्हा जर दुर्दैवाने या देशात मोदी-शाह यांचं राज्य आलं तर सामान्य माणसाच्या घरावर सुद्धा धाडी पडतील. कष्टकरी, सामान्य माणूस, आणि जो नोकरी करून पगार घेतो त्याला सुद्धा ईडीचे लोक पकडून घेऊन जातील. कष्टकरी शेतकऱ्यांना काही किंमत राहणार नाही. म्हणून प्रकाश आंबेडकर जे बोलत आहे ते बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्याशी संमत आहोत.

हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात राम कदम यांनी दाखल केली विशेषाधिकार भंग नोटीस
  2. वंचितसह महाविकास आघाडीचं जागावाटप झालं, जरांगेंच्या उमेदवारीवर वंचितचा प्रस्ताव नाही - संजय राऊत
  3. मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.