ETV Bharat / politics

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध नाही? अपक्ष उमेदवारानं केला अर्ज दाखल, कोण आहे उमेदवार?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 10:38 PM IST

Updated : Feb 15, 2024, 10:55 PM IST

Rajya Sabha Election 2024
Rajya Sabha Election 2024

Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. यात एका अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं निवडणूक बिनविरोध होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मुंबई Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 27 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचं मतदान होत असून अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. सहा जागांसाठी आज महायुतीतील पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. तर महाविकास आघाडीतून एका उमेदवारानं अर्ज दाखल केला. मात्र, सातवा अर्ज पुण्यातील विश्वास जगताप यांनी दाखल केल्यामुळं निवडणूक बिनविरोध होणार की? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

जरांगेंच्या समर्थनात अर्ज दाखल : विश्वास जगताप यांनी सातवा अर्ज दाखल केल्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसंच अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केलीय. आपण मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात हा अर्ज दाखल केला असल्याचं देखील सांगितलंय. मराठा नेता म्हणून जरांगे पाटील हे कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मात्र हे सरकार त्यांची गंभीर दखल घेत नाही. या सरकारनं त्यांची दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. ही माझी मागणी आहे. त्यामुळं आपण मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा अर्ज दाखल केल्याचं विश्वास जगताप यांनी सांगितलंय.


जगताप यांना किती आमदारांचा पाठिंबा? : विश्वास जगताप यांनी राज्यसभेसाठी सातवा व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपणाला दहा आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच मराठा समाजाला न्याय आणि मराठा आरक्षण मिळावं यासाठी हा आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचंही विश्वास जगताप यांनी सांगितलंय. मात्र विश्वास जगताप यांना कुठल्या आणि किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे शुक्रवारी अर्जाची छाननी करतेवेळी समजणार आहे.

राज्यसभेसाठी उमेदवाराला सूचक व अनुमोदन गरजेचे असते : राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार अर्ज दाखल करताना किमान दहा आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. तसंच आमदारांचे सूचक व अनुमोदन असणंही गरजेचे आहे, अन्यथा तो उमेदवारी अर्ज अवैध ठरवला जातो, असं विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी सांगितलंय. मात्र, उमेदवार विश्वास जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दहा आमदारांचा आपणाला पाठिंबा आहे, असं सांगितलंय. परंतु, अद्यापपर्यंत तसे काही कागदपत्रे दिले नाही. शुक्रवारी अर्जाची छाननी आणि अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारपर्यंत आमदारांचे सूचक व अनुमोदन मिळाले नाही तर विश्वास जगताप यांचा अर्ज बाद होईल, असंही सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलंय.


राज्यसभेचं मतदान आणि निकाल कधी : देशभरातून पंधरा राज्यातून 56 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होत आहे. तर महाराष्ट्रातून सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक होत आहे. या सहा जागांसाठी अर्ज दाखल करण्याची आज गुरुवार दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ होती. अर्ज मागे घेण्याची तारीख 16 फेब्रुवारी (शुक्रवार)आहे, तर राज्यसभा निवडणुकीचं मतदान 27 फेब्रुवारी रोजी आहे. त्याच दिवशी सायंकाळी निकाल लागणार आहे, असं विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
  2. अशोक चव्हाणांमुळं नारायण राणेंची पुन्हा राजकीय गोची?
Last Updated :Feb 15, 2024, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.