ETV Bharat / politics

BJP MNS Alliance : राज ठाकरे-अमित ठाकरे दिल्ली दरबारी; भाजपा-मनसेमध्ये बंद दाराआड घडतंय बरंच काही, दक्षिण मुंबईसाठी आग्रही?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 9:50 PM IST

Updated : Mar 19, 2024, 9:28 AM IST

BJP MNS Alliance : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असला तरी जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय. कोण कोणासोबत व कोण कुठून निवडणूक लढणार यावरच महाविकास आघाडी तसंच महायुतीमध्ये चर्चा सुरू आहेत. यातच आता राज ठाकरे यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई BJP MNS Alliance : मनसे आणि भाजपामध्ये युती होणार याबाबतच्या चर्चा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतरच जास्त प्रमाणात सुरू झाल्या होत्या. आता तर लोकसभा निवडणुका असल्यानं या चर्चांना अधिकच बळ आलंय. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. त्यामुळं भाजपासोबत मनसेची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसे संकेतही मागील काही दिवसांपासून भाजपा तसंच शिंदे गटाच्या नेत्यांकडून मिळत होते.

राज-अमित दिल्लीत : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेसाठी महायुतीकडून मनसेला दोन ते तीन जागा अपेक्षित असल्याची चर्चा सुरू आहे. हे किती शक्य आहे हा प्रश्न असला तरी मुंबई दक्षिण हा लोकसभा मतदारसंघ मिळावा यासाठी मनसेचे नेते आग्रही असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मनसेचे तडफदार नेते बाळा नांदगावकर यांना मुंबई दक्षिणमधून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे.

राज ठाकरेंनी दिले होते संकेत : मार्चच्या पहिल्या आठवड्यात मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी तरी राज ठाकरे हे लोकसभेबाबत आपली भूमिका मांडतील, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, जे काही बोलायचं आहे ते मी मुंबईतील गुढीपाडव्याच्या सभेतूनच बोलेन, असं बोलून राज ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडलं होतं. त्यामुळे त्यावेळेसची चुप्पी ही आता दिल्लीला जाऊन बंद दाराआड होणाऱ्या चर्चांसाठी तर नव्हती ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐकू येतो.

फडणवीस, बावनकुळे दिल्लीत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळं लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत सामील करुन घेण्याच्यादृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली दरबारी होऊ शकतो. राज ठाकरे हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही राज ठाकरे हे बैठक करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं भाजपाकडून राज ठाकरे यांना कोणत्या जागेसाठी प्रस्ताव देण्यात येणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. आतापर्यंत भाजपाच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु, या भेटीगाठींपलीकडं दोन्ही पक्षांमधील युतीच्यादृष्टीनं काही ठोस घडलं नव्हतं. मात्र, लोकसभा निवडणुकीच्यानिमित्तानं भाजपा-मनसे युती प्रत्यक्षात येऊ शकते अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

दक्षिण मुंबईसाठी मनसे आग्रही? : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मनसेसाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी मनसेचा दक्षिण मुंबईतील उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगलीय. राज ठाकरे यांचे विश्वासू असलेले बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय, शिंदे गट आणि भाजपामध्ये या मतदारसंघासाठी रच्चीखेच सुरू असल्याचं दिसून आलं होतं. दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा तसंच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे इच्छुक असून, शिंदे गटाकडून नुकतीच राज्यसभेची उमेदवारी मिळालेले मिलिंद देवरा हेदेखील इच्छुक आहेत. दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये मलबार हिल, वरळी असा उच्चभ्रू परिसर येतो, तर दुसरीकडं सर्वसामान्य लोकांचा वावर असलेला लालबाग, शिवडी हा परिसरही याच मतदारसंघात येतो. त्यामुळं दोन्ही कॅटेगरीचे लोक येथे राहत असून, त्याचा फायदा हा भाजपा, शिवसेना की मनसे यांच्यातील कोणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संयम राखण्याचे राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन 9 मार्च रोजी नाशिकमध्ये संपन्न झाला. यावेळी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील अशी आशा मनसैनिकांना होती. मात्र, निवडणुकीचा निर्णय लवकरच घेऊ, असं राज ठाकरे यांनी म्हटल्यानं मनसैनिकांचा अपेक्षाभंग झाला होता. दरम्यान, मनसैनिकांनी संयम राखावा, सत्ता दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असंसुद्धा राज ठाकरे म्हणाले होते.

भाजपा नेत्यांनी दिले होते युतीचे संकेत : "विकसित भारत संकल्पना साधण्यासाठी इतर घटक पक्ष सामील होणार असेल तर हरकत नाही. राज ठाकरे आणि भाजपाचे विचार सारखे आहेत," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. तर "मनसे संदर्भात आता तरी मी काहीही बोलू शकत नाही. मला वाटतं की चर्चा खूप होत आहेत. या संदर्भात निर्णय झाला की आम्ही तुम्हाला सांगू," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसंच भाजपा आणि मनसेची भूमिका एकच असल्याचंही फडणवीस म्हणाले होते.

हेही वाचा -

  1. शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक; राज ठाकरेंकडं चर्चेसाठी मांडला प्रस्ताव
  2. देवेंद्र फडणवीसांनी दिले मनसेबरोबर युतीचे संकेत; म्हणाले, "भूमिका भाजपासारखीच"
  3. Mahayuti Seat Allocation : 'मनसे'बरोबर युती? फडणवीस आणि बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...
Last Updated :Mar 19, 2024, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.