ETV Bharat / politics

"मुंबई मेट्रो, BKC, वांद्रे-वरळी सी लिंकसह अनेक कामं...."; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 10:16 PM IST

Updated : Mar 9, 2024, 10:26 PM IST

Mallikarjun Kharge : मुलुंड येथे मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित 'एक दिवसीय रणशिंग प्रशिक्षण' शिबिराचं उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. मुंबईच्या विकासाबाबत मोठा दावाच खरगे यांनी केलाय.

Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खरगे

मुंबई Mallikarjun Kharge : शहराचा विकास आणि आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मिळालेली ओळख ही काँग्रेस काळातच झाली. काँग्रेस सरकार असतानाच मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन या क्षेत्रांची भरभराट झाली. मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस सरकारनं आणलेल्या आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स, मंत्रालय, सरकारी कार्यालयांचा विस्तार हा काँग्रेसच्या काळातच झाला. राजीव गांधी वांद्रे-वरळी सी लिंक, चेंबूर लिंक रोड, कोस्टल रोड, अटल सेतू या प्रकल्पांची आखणी विलासराव देशमुख आणि डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना करण्यात आली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

शिबिराचं केलं ऑनलाईन उद्घाटन : मुंबई विभागीय काँग्रेसचे एक दिवसाचे ‘रणशिंग’ प्रशिक्षण शिबिर मुलुंड येथे पार पडलं. या शिबिराचं उद्घाटन मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑनलाईन केलं. यावेळी खरगे म्हणाले की, "मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना दोन वर्षांपासून तिजोरी लुटण्याचं काम सुरु आहे. पालिका फक्त भाजपा आमदारांनाच निधी देते. धारावी आणि मुंबईतील महत्वाचे भूखंड, सर्व नियम अटी बाजूला ठेवून अदानी आणि भाजपाच्या मित्रांना दिले जात आहेत. मुंबई मेट्रोसाठी पर्यावरणाचा विचार न करता आरे येथील झाडांची कत्तल करण्यात आली. सरकारी धोरणे सामान्य मुंबईकरांच्या हितासाठी नाही तर केवळ मुठभर श्रीमंतांसाठी आखली जात आहेत."

कोट्यवधींची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात पळवली : पुढे बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "महिला बचत गट आणि बेरोजगारांना दिलेलं स्वच्छतेचं काम काढून मोठ्या कंपनीसाठी टेंडर काढले. यामुळं 75 हजार लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतून कोट्यवधींची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात पळवली जात आहे. महानंद दूध प्रकल्पही गुजरातच्या हाती सोपवला. याला भाजपाने विरोध केला नाही किंवा त्यासंदर्भात एक शब्दही काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर मोठ-मोठ्या बाता मारतात आणि विरोधी पक्षांवर आरोप करतात. परंतु, कॅगच्या अहवालावर ते बोलत नाहीत. कॅग आणि काही प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार भाजपाने 8.5 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे."

भाजपाने विविध पक्षातील 420 आमदारांना विकत घेतलं : "देश आणि समाजाच्या हिताचं भाजपाला काही देणं घेणं नाही. पक्ष फोडणं, नेत्यांना विकत घेणं हे काम ते करत असतात. आतापर्यंत भाजपाने विविध पक्षातील 420 आमदारांना विकत घेतलं आहे. महाराष्ट्रातही हेच चाललं आहे. महायुती सरकारही आमदारांची तोडफोड करुन बनलं आहे. महाराष्ट्रातील वातावरण मविआच्या बाजूनं आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला भेदभावाची वागणूक दिली जाते हे जनतेपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे. घरोघरी जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवा आणि विरोधकांचा एकही खासदार जिंकून येणार नाही यासाठी काम करा," असं आवाहन मल्लिकार्जुन खरगे यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. महायुतीतील जागावाटप 'या' तारखेला जाहीर होणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
  2. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण...; भास्कर जाधवांचं भावनिक पत्र, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?
  3. माझ्यावर झालेल्या संस्कारामुळं... ; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीबाबत सुळे यांची प्रतिक्रिया
Last Updated : Mar 9, 2024, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.