ETV Bharat / politics

कल्याणचा सुभेदार कोण? मुख्यमंत्री शिंदे पुत्र की दिवंगत आनंद दिघेंचा पुतण्या? - Kedar Dighe VS Shrikant Shinde

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 5:32 PM IST

Kedar Dighe VS Shrikant Shinde : शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाच्या बहुतांश महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत. शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले असून मुख्यमंत्री पुत्र विरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे असा सामना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) पाहायला मिळू शकतो. हा 'सामना'च कल्याणचा सुभेदार कोण? हे ठरवणार आहे.

Kedar Dighe VS Shrikant Shinde
केदार दिघे VS श्रीकांत शिंदे

ठाणे Kedar Dighe VS Shrikant Shinde : राज्यातील सत्ता संघर्षानंतर ज्या मोजक्या जागा प्रतिष्ठेच्या मानल्या जातात, त्यात श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपुत्र खासदार असल्यामुळे या मतदारसंघाला वेगळं वलय आहे. दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात त्यांचे शिष्योत्तम विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती वर्चस्व ठेवलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून आले. पण ठाणे आणि कल्याणची 'शिवसेनेचे बालेकिल्ले' अशी ओळख अधिक ठळक करणारे एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले आणि या मतदारसंघांमधली समीकरणं बदलली. त्यामुळं आता बालेकिल्ल्यांत पहिल्यांदाच 'शिवसेना विरुद्ध शिवसेना' असा सामना रंगणार आहे.

कल्याणचा सुभेदार कोण? : गेल्या काही महिन्यांमधला घटनाक्रम पाहिल्यास लहान भासणाऱ्या बाबीही ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांमधली गणितं बदलू शकतात. या मतदारसंघांमध्ये शिंदे यांचा वरचश्मा आहे. त्यामुळे साहजिकच या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूला बराच काळ लोटूनही स्मृती ठाणे आणि कल्याणकरांच्या ह्रयात ताज्या आहेत. त्यामुळे दिवंगत दिघे यांच्याशी थेट संबंधित असलेल्या व्यक्तीला लोकसभेचं तिकीट देण्याची राजकीय हुशारी उद्धव ठाकरे यांना दाखवून द्यावी लागेल. कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना मात देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर दिघे यांच्या पुतण्याच्या, केदार दिघे यांच्या उमेदवारीचा भक्कम पर्याय उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. केदार दिघे यांना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास शिंदे विरुद्ध दिघे असा चुरशीचा सामना रंगू शकतो. यात विजयश्री कुणाला मिळणार? पर्यायाने कल्याणचा सुभेदार कोण होणार? या प्रश्नांची उत्तरं मतदारांना इव्हीएम मशिनमधून द्यायची आहेत.


2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाट : 2009 साली ठाण्यापासून वेगळा होत कल्याण हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यावेळी येथून आनंद परांजपे हे निवडून आले होते. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारानेसुद्धा या मतदारसंघात एक लाखांहू अधिक मतं मिळवली होती. तर 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एकनाथ शिंदेंनी मुलगा श्रीकांत शिंदेंना मैदानात उतरवलं होतं. तर तत्कालीन खासदार आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अपेक्षेप्रमाणे, 2014 ची लोकसभा निवडणूक एकतर्फी झाली. पण पुन्हा एकदा मनसेने एक लाखांच्यावर मतं मिळवली आणि ती 2009 च्या प्रमाणात जास्त होती. 2019 मध्ये पुन्हा श्रीकांत शिंदे मैदानात होते. विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे उमेदवार होते. या निवडणुकीत विजय मिळवण्याची फक्त औपचारिकता श्रीकांत शिंदे यांना पूर्ण करायची होती आणि ती त्यांनी केली.



ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा 3 ते 4 वेळा दौरा करत राजकीय वातावरण तापवलं. आता त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची आवई उठली. कल्याणविषयी चर्चांचं चर्वितचर्वण सुरु असताना दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना कल्याणची सुभेदारी मिळवण्याचा मोका उद्धव ठाकरे देतील, अशी दाट शक्यता आहे. याविषयी खुद्द केदार दिघे मात्र अतिशय सावध भूमिका देत आहेत. आपल्या नावाची चर्चा असली तरी साहेबांनी (उद्धव ठाकरे यांनी) आपल्याला अद्याप आदेश दिला नसल्याची प्रतिक्रिया देऊन ते मोकळे झाले आहेत. असं असलं तरी संभाव्य उमेदवारीची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी कल्याण मतदारसंघात शक्य त्या त्या मार्गांनी मतदारांशी संपर्कात रहायला सुरुवात केली आहे.


युतीत सर्वच अलबेल : दुसरीकडं कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे खासदार तथा मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजपानं दावा करून उमेदवार उभा करण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून केली होती. हे लक्षात आल्यानंतर शिंदे यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य न करण्याचं धोरण अवलंबलं. श्रीकांत शिंदे आणि राज्य सरकारमधील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातही कलगी-तुरा रंगलेला पाहायला मिळाला. संतप्त झालेल्या श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देतो, म्हणण्यापर्यंत प्रकरण ताणलं गेलं. मात्र, यावर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस टी. सी. रवी यांनी शिंदे भाजपा युती असून खासदार शिंदेंना राजीनामा देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.




कल्याण लोकसभेवरून भाजपा शिंदे गटात दुरावा : गेल्या वर्षभरात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात चार वेळा येऊन स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापवलं. त्यामुळं कल्याण लोकसभेवरून भाजपा शिंदे गटात दुरावा निर्माण झाली. त्यातच डोंबिवली पूर्व भाजपाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर एक गंभीर आरोप झाला. या मुद्द्यावर शिंदे गट रान उठवत असल्याचा आरोप भाजपा गोटातून झाला आणि मानपाडा पोलीस ठाण्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी भाजपानं मोर्चा काढला. त्यामुळं भाजपा शिंदे गटात आणखीच राजकीय तणाव निर्माण झाला. त्यातच आणखी भर पडली ती भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मतदान आणि राजकीय मदत न करण्याचा निर्णय घेतला होता.

कल्याण लोकसभा मतदारसंघात या समाजाची संख्या मोठी : कल्याण लोकसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात राहतात. त्याबरोबरच उल्हासनगर मध्ये सिंधी समाजाचं प्रमाण लक्षणीय आहे. अंबरनाथमध्ये मुंबईमधील चाकरमानी मोठ्या संख्येने स्थलांतरीत झालाय, 'हाच तो मराठी मतदार'! इथे वारकरी संप्रदायाची संख्या मोठी आहे. कल्याण पूर्वेत उत्तर भारतीय तसंच कोकणातल्या मतदारांची संख्या मोठी आहे. कल्याण ग्रामीणमध्ये आगरी-कोळी आणि वारकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. डोंबिवलीत मिश्र वातावरण आहे. इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची संख्या मोठी आहे. तर ब्राह्मण समाजाची वस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय कळवा-मुंब्रामध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.


भाजपा-शिंदे गटात वाद : कल्याण लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा येत असून गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), रवींद्र चव्हाण (डोंबिवली), कुमार अयलानी (उल्हासनगर) असे भाजपाचे तीन आमदार आहेत. तर राजू पाटील कल्याण ग्रामीण मधून मनसे तर शरद पवार राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्राचे आमदार, तसंच शिंदे गटाचा एकमेव आमदार बालाजी किणीकर हे अंबरनाथ विधानसभेचं प्रतिनिधीत्व करतात. एकंदरीतच या मतदार संघात भाजपाची सर्वाधिक राजकीय ताकद असल्यानं भाजपानेही या मतदार संघावर दावा केला. शिवाय गेल्या काही महिन्यापासून भाजपा - शिंदे गटात सुरू असलेल्या वादाचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करणार, हे निश्चित. एकूण परिस्थितीत कल्याणच्या सुभेदाराला अडचणींचा डोंगर पार करावा लागणार आहे, हे सांगण्यासाठी राजकीय पंडितांची गरज नाही.



हेही वाचा -

  1. मनस्थितीवर परिणाम झाल्यामुळं अशी वक्तव्य; सुनील तटकरेंची विजय शिवतारेंवर टीका - Sunil Tatkare on Vijay Shivtare
  2. 'गेला आदित्य कुणीकडे?' गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे राजकारणातून गायब, विरोधकांचं टीकास्त्र - Aaditya Thackeray
  3. "शिवसेना नाही तर भाजपानं उमेदवारी द्यावी", निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम - Vijay Shivtare News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.