ETV Bharat / politics

'कोळशाच्या खाणी'त कोणाच्या 'विजाया'चा 'चंद्र'? कॉंग्रेस 'प्रतिभा' राखणार की भाजपाचं 'कमळ' पुन्हा फुलणार, काय असेल समीकरण?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 8:01 AM IST

Chandrapur Lok Sabha 2024
Chandrapur Lok Sabha 2024

Chandrapur Lok Sabha 2024 : कोळशासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुर लेकसभा मतदारसंघात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारांप्रमाणेच राजकीय पक्षही संभ्रमावस्थेत असल्याचं दिसतंय. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही बाळू धानोरकरांनी विजय मिळवत महाराष्ट्रात कॉंग्रेसची पत राखली होती. मात्र त्यांचं निधन झाल्यानं आता या मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली आहेत.

चंद्रपूर Chandrapur Lok Sabha 2024 : 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात सर्वत्र नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभेत मात्र वेगळं चित्र दिसून आलं होतं. काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी भाजपाचे उमेदवार, तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा 44 हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. बाळू धानोरकर महाराष्ट्रातुन निवडून येणारे काँग्रेसचे एकमेव खासदार होते. मात्र, धानोरकर यांचं 2023 मध्ये अकाली निधन झालं आणि या मतदारसंघाची सर्व राजकीय समीकरणं पलटली. आता 2024 मध्ये काँग्रेस आणि भाजपाची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच यावेळी नेमकी कुठली राजकीय समीकरणं असणार याबाबत देखील मतदारांमध्ये उत्सुकता बघायला मिळतेय.


कसा आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघात चंद्रपुर जिल्ह्यातील 4 विधानसभा आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. 30 जानेवारीपर्यंत सहाही मतदारसंघामध्ये 18 लाख 29 हजार 111 मतदारांची नोंद झालीय. यात 8 लाख 87 हजार 313 महिला तर 9 लाख 41 हजार 748 पुरुष मतदारांचा समावेश आहे.


पवारांनी सूत्रं हलवली आणि धानोरकरांना मिळालं तिकीट : 2014 मध्ये बाळू धानोरकर हे शिवसेनेचे आमदार होते. 2019 मध्ये आपण लोकसभा निवडणुक लढणार असे संकेत त्यांनी आधीच दिले होते. मागिल निवडणुकीत काँग्रेसकडे कुठलाही सक्षम उमेदवार नव्हता. यावेळी धानोरकर यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसकडून तिकीट मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दिल्लीत जाऊन त्यांनी तळही ठोकला, मात्र उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी शरद पवार यांची भेट घेत लोकसभा निवडणुकीची समीकरणं सांगीतली. त्यानंतर पवार यांनी खुद्द दिल्लीतील पक्षश्रेष्ठीशी बोलणी करुन दिली. बाळू धानोरकर हे निवडणूक जिंकून येत आहे, त्यांना तिकीट द्या अन्यथा ही जागा राष्ट्रवादीला सोडा असं स्पष्ट त्यांनी सांगितलं. त्यामुळं पवारांनी सूत्रे हलवली आणि अखेर बाळू धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली, आणि पवारांचं भाकीत देखील खरं ठरलं.



गेल्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतं : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत वंचितचा फॅक्टर हा प्रभावी होता. वंचितच्या उमेदवारानं इथं तब्बल एक लाखापेक्षा अधिकची मतं मिळवली. राजेंद्र महाडोळे यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या प्रचाराआठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर तसंच एमआयएमचे असदउद्दीन ओवेसी हे देखील आले होते. तर काँग्रेसचे बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ अमित शाह येणार होते. मात्र, ऐनवेळी शाह यांचा दौरा रद्द झाला. गेल्या निवडणूकीत बाळू धानोरकरांना 5 लाख 59 हजार 507 मतं मिळाली, तर भाजपाचे हंसराज अहीर यांना 5 लाख 14 हजार 744 आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांना 1 लाख 12 हजार 071 मतं मिळाली होती. यात धानोरकर यांनी अहीर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता.



दूधवाला विरुद्ध दारुवालाचा मुद्दा गाजला : चंद्रपूर जिल्ह्यात 2015 मध्ये दारुबंदी करण्यात आली होती. बाळू धानोरकर यांची अनेक दारुची दुकानं आहेत, तर हंसराज अहीर यांचा दुधाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळं भाजपाकडून दूधवाला की दारुवाला हा मुद्दा प्रचारात आणण्यात आला. मात्र याचा मोठा फटका भाजपाला बसला. कारण चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यापासून गुन्हेगारीत कमालीची वाढ झाली होती. गल्लोगल्लीत अवैध दारु मिळत होती. शाळेकरी मुलं, महिला दारुविक्री व्यवसायात यायला लागली. त्यामुळं जिल्ह्यात फसवी दारुबंदी आहे, असा लोकांची धारणा झाली. याचा लाभ धानोरकर यांनी उठवला. आपल्याकडं दारुची दुकानं आहेत, मात्र जिल्ह्यात दारुबंदी होऊनही दारु मिळते याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याचा फटका भाजपाला बसला.


ओबीसी समीकरण महत्त्वाचं : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात कुणबी समाजाची संख्या ही सर्वाधिक आहे. बाळू धानोरकर हे कुणबी समाजाचे होते. याचा मोठा लाभ धानोरकर यांच्या पारड्यात पडला आणि ते निवडून आले होते.

जय-पराजयाची कारणं : दिवंदत बाळू धानोरकर हे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते. धानोरकरांच्या रुपानं काँग्रेसला एक नवा आश्वासक चेहरा मिळाला होता. आघाडी नसतानाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धानोरकर यांना खुला पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडं प्रचारापासून भाजपाचा एक मोठा गट अलिप्त असल्याचं दिसून आलं. त्यातच अहीर यांनी चंद्रपूर आणि बल्लारपूर विधानसभेकडं दुर्लक्ष केलं याचाही फटका त्यांना बसला. अहीर हे सलग दोन वेळा निवडून आले होते. त्यामुळं त्यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी होती. विशेष म्हणजे अहीर आजपर्यंत तिरंगी लढतीत विजयी झाले होते. मात्र, 2019 मध्ये थेट लढत झाली. यात वंचितचा फटका भाजपाला बसला. बल्लारपूर विधासभेतील भाजपची हक्काची माळी समाजाची मतं वंचितकडे वळली. तसंच हे लोकसभा क्षेत्र ओबीसीबहुल क्षेत्र आहे. मोठमोठे उद्योग इथं असून कामगार मतदारांची संख्या लक्षणीय आहे. प्रत्येक विधानसभेतील सामाजिक आणि राजकीय समीकरण हे वेगवेगळं आहे. पूर्व विदर्भातील ओबीसी आणि आंबेडकरी चळवळीचे हे केंद्र आहे. या लोकसभेतील तीन मतदारसंघात भाजपाचे आमदार, दोन ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्ष आमदार आहे.


2024 ची राजकीय समीकरणं : मे 2023 मध्ये खासदार बाळू धानोरकर यांचं अल्पशा आजारानं आकस्मिक निधन झालं. यानंतर येथील राजकीय गणितात बदल झाले. धानोरकर यांच्या पत्नी ह्या वरोरा विधानसभेच्या आमदार आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसकडून आमदार सुभाष धोटे, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नाव देखील चर्चेत आहेत. तर भाजपाकडून हंसराज अहीर यांना पक्षाकडून पुन्हा संधी दिली जाते का याबाबत देखील अद्याप स्पष्टता नाही. राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नावही देखील चर्चेत आहे. सोबत ओबीसी संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक जीवतोडे यांना देखील संधी दिली जाऊ शकते. दोन्ही जिल्ह्याभरात त्यांच्या शैक्षणिक संस्थाचं जाळं आहे. सोबत ते कुणबी समाजातून येतात. सोबत राजुऱ्याची माजी आमदार संजय धोटे यांचं नाव देखील चर्चेत आहे. मात्र दोन्ही पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केले नाही. मात्र येत्या काही दिवसात ही बाब समोर येणार आहे.

हेही वाचा :

  1. दक्षिण मुंबई बहुभाषिक लोकसभा मतदार संघात काय आहेत राजकीय समीकरणे? महायुतीपुढे ठाकरे गटाचं आहे आव्हान
  2. शिर्डी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिष्ठा पणाला; उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.