ETV Bharat / politics

माझी जात न बघता पक्षाने मला उमेदवारी दिली; हंसराज अहीर यांचं सूचक वक्तव्य कुणासाठी?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 7:02 PM IST

Hansraj Ahir
हंसराज अहीर

Hansraj Ahir : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपाकडून लढणाऱ्या अनेक संभावित नावांची चर्चा आहे. अशातच भाजपाकडून सलग चार वेळा उमेदवारी मिळणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देखील या स्पर्धेत आपण प्रबळ दावेदार असल्याचे संकेत दिले आहेत. 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी चंद्रपूरच्या राजकारणाबाबत अनेक सूचक वक्तव्यं केली आहेत.

प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर

चंद्रपूर Hansraj Ahir : राज्यभरात लोकसभेच्या निवडणुकीची (Loksabha Election2024) चर्चा सुरू झालीय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथे काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांना पराभूत केलं होतं. 2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ याच जागी विजय मिळाला होता. मात्र मे 2023 मध्ये धानोरकर यांचं अकाली निधन झालं होतं. मात्र या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली नव्हती. यावेळी लोकसभेचं सर्व गणित वेगळं झालं आहे. भाजपाकडून अनेक नावांची चर्चा आहे. लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार किंवा हंसराज अहीर अशी चर्चा सुरू असतानाच भाजपाने लोकसभा क्षेत्राच्या निरीक्षकांची यादी जाहीर केली. यात मुनगंटीवार आणि अहीर या दोघांचीही नावे होती. मुनगंटीवार यांना बीड तर अहीर यांना रावेर (जळगाव) लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळं या दोघांच्या नावांच्या चर्चेवर पूर्णविराम लागला.

माजी आमदार संजय धोटे यांच्या नावाची चर्चा : मुनगंटीवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, मात्र पक्षानं आदेश दिला तर नक्कीच लढेन असं सांगत ही चर्चा कायम ठेवली. याच दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे आणि माजी आमदार संजय धोटे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली. यासाठी दुसऱ्या राष्ट्रीय पक्षातून एखाद्या नेत्याला आयात केलं जाणार याबाबत देखील आता आतल्या गोटात जोरदार चर्चा रंगू लागलीय.




उमेदवारीबाबत केलं सूचक वक्तव्य : मी ज्या समाजामधून येतो त्या समाजाची 100 घरे देखील मतदारसंघात नाहीत. माझ्या समाजाची अधिक मते नाही तरीही माझ्या पक्षाने जातीपातीचा विचार न करता मला सलग चार वेळा उमेदवारी दिली. त्याचबरोबर मी जिंकून देखील आलो, म्हणजेच पक्ष जिंकला. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की, माझा पक्ष जातपात बघत नाही आणि या मतदारसंघाची जनता देखील याबाबत सुजाण आहे. या मतदारसंघात ओबीसी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही कुणबी समजाचे येथे प्राबल्य आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार धानोरकर याच समाजाचे होते. मागचं समीकरण बघता भाजपा याच समाजातील उमेदवाराला प्राधान्य देणार का? अहीर यांच्या सूचक वक्तव्यानं आता पुन्हा यावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.



मी पक्ष बदलून कधी उमेदवारी मागितली नाही : मी नेहमी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. तिकीट मिळावे यासाठी मी कधी माझा पक्ष बदललेला नाही. म्हणून माझ्या पक्षात ताकद आहे. आमच्या पक्षातील काही लोक उमेदवारी मागत असतील पण पक्ष म्हणून भाजपाच निवडणूक जिंकेल असंही अहीर म्हणाले.


पक्षांतर करणाऱ्यांना जनतेत स्थान नसते : जे तिकीट मिळविण्यासाठी पक्षांतर करतात अशा लोकांना जनतेच्या मनात कधी स्थान राहात नाही, याची मला जाणीव आहे. अहीर यांच्या या सूचक वक्तव्याचं अनेक राजकीय अर्थ निघण्याची शक्यता आहे. तिकीट मिळण्यासाठी पक्षांतर कारण्याची तयारी कोण करतंय याबाबत देखील आता चर्चा सुरू झालीय.

हेही वाचा -

  1. 'गोदावरी नदी'त कोण लगावणार विजयाची 'डुबकी'? खासदार गोडसे हॅट्रीक करणार की भाजपाचं फुलणार कमळ?
  2. अमित शाह यांनी बैठक घेऊनही जागा वाटपाची बैठक निष्फळ? भाजपाच्या लोकसभा उमेदवारांची रखडली यादी
  3. अमित शाहांची जोरदार फटकेबाजी; शरद पवारांना दिलं ओपन चॅलेंज, राहुल गांधींवरही हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.