ETV Bharat / bharat

स्टॅलिननंतर ए. राजा यांचं भारतासह रामाबद्दल खळबळजनक वक्तव्य, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया

author img

By PTI

Published : Mar 5, 2024, 4:11 PM IST

DMK Leader A. Raja Controversial Statement : तामिनाडूतील डीएमकेचे नेते माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वादाचा वनवा पेटवला आहे. त्यांनी भारत देशाबद्दल आणि प्रभू रामाबद्दल मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं असून देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो

चेन्नई/ तामिळनाडू : DMK Leader A. Raja Controversial Statement : डीएमकेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी खळबळजनक विधान करून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे. राजा यांनी भारत आणि सनातन धर्माबद्दल मोठं आक्षेपार्ह वक्तव्य केलं असून देशभरात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ए. राजा म्हणाले, भारत हे एक राष्ट्र नाही, ही गोष्ट सर्वांनी नीट समजून घ्या. भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. भारत हा एक उपखंड आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माद्दलच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच त्यांना फटकारलं. त्यानंतर ए. राजा यांनी पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे.

'जय श्रीराम' हा नारा घृणास्पद' : ए. राजा म्हणाले, "तुम्ही म्हणत असाल की, अमूक एक तुमचा देव आहे आणि तुम्ही इतरांना 'भारत माता की जय' बोलायला सांगत असाल तर आम्ही तुमचा ईश्वर मानत नाही. तसंच तुमच्या भारतमातेचा आम्ही स्वीकार करत नाही. त्यांना सांगा आम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत. माझा रामायणावर आणि रामावर विश्वास नाही." राजा यांनी यावेळी हनुमानाची वानराशी तुलना केली. तसंच 'जय श्रीराम' हा नारा घृणास्पद असल्याचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले ए. राजा : माजी केंद्रीय मंत्री ए. राजा म्हणाले, भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. एका राष्ट्राचा अर्थ होतो, एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तेव्हा ते एक राष्ट्र असतं. परंतु, भारत एक राष्ट्र नाही. भारत एक उपखंड आहे. भारत हा एक उपखंड असल्याचं ए. राजा म्हणाले, इथे तामिळ हे एक राष्ट्र म्हणजेच एक देश आहे. मल्याळम एक भाषा एक राष्ट्र, एक देश आहे. उडिया एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. अशी सगळी राष्ट्रं मिळून भारत हा मोठा उपखंड तयार होतो. त्यामुळे भारत हा देश नसून एक उपखंड आहे असा दावा त्यांनी केला आहे.

मतभेद स्वीकारले पाहिजेत : पुढे राजा म्हणाले, या उपखंडात वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. तुम्ही तामिळनाडूला आलात तर तिथली वेगळी संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. केरळमधील संस्कृती वेगळी आहे. दिल्लीत वेगळी संस्कृती आहे. ओडिशात वेगळी संस्कृती आहे. काश्मीरमध्ये एक वेगळी संस्कृती आहे, तुम्ही त्या संस्कृतींचा स्वीकार करा. मणिपूरमधील लोक श्वानाचं (कुत्रा) मांस खातात. तुम्ही ती गोष्टदेखील स्वीकारली पाहिजे. एखादा समाज गोमांस खात असेल तर त्यात तुम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. त्या लोकांनी तुम्हाला गोमांस खायला सांगितलं आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत. परंतु, तुम्ही ते मतभेद स्वीकारले पाहिजेत असंही ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते स्टॅलिन : उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी केली होती. तसंच, त्यांनी सनातन धर्माविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यावरून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आहे आणि आता तुम्ही याप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मागताय? तुम्ही सामान्य व्यक्ती नसून एक राजकारणी आहात याचं भान असूद्या अशा शब्दांत न्यायालयाने स्टॅलिन यांना फटकालं होतं.

हेही वाचा :

1

2

3

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.