ETV Bharat / bharat

शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं; जागांची अदलाबदल होण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 9:13 PM IST

Updated : Mar 5, 2024, 9:25 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत आता अंतिम बोलणी सुरू झालीय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी (दि. 5 मार्च झालेल्या भेटीदरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर चर्चा झालीय. कोल्हापूरची जागा काँग्रेसला तर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत होण्याची शक्यता आहे. अन्य जागांबाबतही शरद पवार यांनी फासे टाकायला सुरुवात केली असल्याची माहिती आहे.

मुंबई Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी आता जवळपास अंतिम टप्प्यात आलीय. या पार्श्वभूमीवर मुंबईत शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी चर्चा झाली.

जागावाटप फायनल? : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार असतील. हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावा अशी चर्चा झाली, तर या बदल्यात काँग्रेसकडे असलेला सांगली मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात यावा याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

चंद्रहार पाटील मातोश्रीवर : सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाणार हे स्पष्ट होत असल्याने, या जागेवरून इच्छूक असलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराजांनी उभं राहावं यासाठी शरद पवार यांनी त्यांना आग्रह केला होता. त्यानुसार महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आपण लढावं. मात्र, ही निवडणूक लढवावी, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्या निवडणुकीची जबाबदारी घेतली असून, त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, असं म्हटले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांनीही याबाबत अनुकूलता दाखवल्यामुळे आता कोल्हापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.

महाराजांनी मशालीवर निवडणूक लढवावी : कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र, स्थानिक राजकीय गणितं आणि मालोजीराजे यांच्या भविष्यासाठी शाहू महाराजांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार आता कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात येईल, तर त्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार आहे. हातकणंगले हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे कायम राखला आहे. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, त्यांनी जर ही उमेदवारी नाकारली. तर त्या जागेवरून जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सुरू आहेत.

सांगलीतून चंद्रहार पाटील : ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत चंद्रहार पाटील यांनी मतदारसंघाबाबतची माहिती आणि सर्व राजकीय समीकरणे ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर चंद्रहार पाटील यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी संमती दर्शवली आहे. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच पाठिंबा दर्शवला होता. मात्र, अद्याप शरद पवार यांनी संमती दर्शवलेली नाही. पवारांची संमती मिळाल्यास चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा :

1 "पक्ष आणि पवार कुटुंबात फूट नाही"; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

2 घराणेशाहीवरुन अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, "इंडिया आघाडीतील...."

3 "शाहू महाराजांनी हरण्यासाठी निवडणूक लढवू नये", रामदास आठवलेंचा सल्ला

Last Updated :Mar 5, 2024, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.