Nitin Gadkari News: निवडणूक जिंकण्यासाठी किलोभर सावजी मटण घरोघरी पोहचवले तरीही हरलो - नितीन गडकरी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी देशात ओळखले जातात. राजकारणापलीकडे जाऊन देशात विकासाची पायाभरणी करण्यात त्यांचे योगदान कुणीही नाकारू शकणार नाही. काही दिवसांपासून ते मनमोकळेपणे जुने किस्से आपल्या भाषणात सांगत आहेत. नुकतेच नागपुरात आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, निवडणूका जिंकण्यासाठी मी अनेक प्रयोग केले. लोकांच्या घरी एक-एक किलो सावजी मटण पोहचवले तरी देखील, आम्ही निवडणूका हरलो आहे. जनता हुशार झाली आहे. 'जो देता है उसका खा लो' पण मते ज्याला द्यायची आहेत त्यालाच देतात. ज्यावेळी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल त्यानंतर तेच लोक तुमच्यावर जात, धर्म पंथाच्यापलिकडे जाऊन प्रेम करतील. लोक म्हणतात खासदारकीचे, आमदारकीचे तिकीट द्या, नाही तर एमएलसी करा. हे सर्व होत नसेल तर मेडिकल कॉलेज द्या, हेही होत नसेल तर इंजिनीअरिंग कॉलेज द्या, किमान एक तरी बीएड कॉलेज द्या, नाही तर किमान एक तरी प्राथमिक शाळा द्या. शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही आणि अर्धा पगार आम्ही अशीही रोजगाराची हमी असे म्हणत राजकारणातील परिस्थितीचे वर्णन त्यांनी केले आहे.