Arpit kala Kendra: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; अर्पित कला केंद्राचे मोठे नुकसान
रायगड : जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक दिवस पडणाऱ्या पावसामुळे, कळवे येथे घर पडून घराचे व गणेश मूर्ती कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र पहाटे कारखान्यात कुणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे. मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे पेण तालुक्यातील शेतासह सकल भागांमध्ये पाणी साचले आहे. ग्रामीण भागातील घरात व दुकानात पाणी घुसून नुकसान झाले आहे. जोहे, हमरापूर विभागातील गणेश मूर्ती कारखानदारांचे खूप मोठे नुकसान होत आहे. आज पहाटे मुसळधार पावसामुळे कळवे येथील सागर पाटील यांचे घर पडून त्यांच्या अर्पित कला केंद्र या गणेश मूर्ती कारखान्याचे मोठे नुकसान झाले. सदर कारखान्यात असलेल्या माती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असंख्य गणेश मूर्ती भिजल्या आहेत. याबाबतची माहिती पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना मिळताच, तात्काळ तलाठी सर्कल यांना घटनास्थळी पाठवून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तर मुसळधार पावसामुळे घर पडून मोठी वित्तहानी झाली असल्याने, कारखानदार सागर पाटील हे हवालदिल झाले आहेत.