जालन्यात महावितरण कंपनीच्या गलथानपणामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
जालना - अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकऱ्यांचा सात एकर ऊस जळून खाक झाला असून, त्यांचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याआधीही चार वेळेस विद्युत तारामुळे ऊस पेटला होता. अंतरवाली सराटी येथील शेतकरी किरण तारख यांच्या वडीगोद्री शिवारातील गट नं. १०७ मधील ७ एकर क्षेत्रावर गेल्यावर्षी आडसाली उसाची लागवड केली होती. आडसाली उस असल्याने त्याचे पीकही जोमात आले होते. तारख यांच्या शेतातून वडीगोद्री ३३ के.व्ही.उप केंद्रातून शहागड फिडरची कृषी पंपासाठी वीज वाहिनी गेलेली आहे. त्याचबरोबर शेतातून गावठाण फिडर ची वीज वाहिनी गेली आहे. किरण तारख यांच्या शेतात वीज वाहिनीचे जाळे असल्याने या १५ एकर क्षेत्रात २० विजांचे खांब आहेत. यावर पारख यांनी नुकसानभरपाईची मागणी महावितरणकडे केली आहे.