ETV Bharat / state

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे अंबाजोगाईत निषेध आंदोलन

author img

By

Published : Jun 7, 2021, 6:31 PM IST

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे अंबाजोगाईत निषेध आंदोलन
पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे अंबाजोगाईत निषेध आंदोलन

अंबाजोगाई येथे रिलायन्स पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

अंबाजोगाई (बीड) - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या सूचनेनुसार आज रोजी सकाळी ११ वाजता पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅस दरवाढीच्या विरोधात बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पेट्रोल पंपावर निषेधाचे फलक झळकावून आणि काळे झेंडे दाखवून, केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा करून आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाई येथे रिलायन्स पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला, अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली. या आंदोलनात कोविड पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

महागाईचा मार सहन करावा लागत आहे
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या किंमती या भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रूपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रूपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रूपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढी विरोधात आज रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार राज्यासह बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, गेवराई, आष्टी-पाटोदा-शिरूर, परळी, धारूर या तालुक्यात निषेधाचे फलक झळकावून आणि काळे झेंडे दाखवून, केंद्रातील भाजपच्या मोदी सरकार विरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा करून आंदोलन करण्यात आहे.

अंबाजोगाई येथे रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात महाराष्ट्र राज्य कापूस पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, सुनिल व्यवहारे, राणा चव्हाण, माणिक वडवणकर, सज्जन गाठाळ, गणेश मसने, सुनिल वाघाळकर, पांडुरंग देशमुख, भारत जोगदंड, दिनेश घोडके, अकबर पठाण, अजीम जरगर, रफिक गवळी, अनिस पठाण, मुख्तार शेख, खलील शेख, रमेश कदम, अशोक देवकर, सचिन जाधव, अमोल मिसाळ, महेश वेदपाठक आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

मोदी सरकार हे मुठभर उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार
यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, केंद्रातील भाजप प्रणीत मोदी सरकारने पेट्रोल- डिझेल-गॅसमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रूपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती. ती आज ३२.९० रूपये म्हणजे २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रूपये होती. ती आज ३१.८० रूपये आहे म्हणजे ८२० टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत तब्बल २० ते २५ लाख कोटी रूपयांची लुटमारी केली आहे. तसेच २००१ ते २०१४ या चौदा वर्षांच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रूपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये याचे नांवे तो १८ रू.प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रू. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रति लिटर ४ रूपये कृषी सेस घेतला जातो. या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यासह बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाचवेळी विविध ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

मोदी सरकार मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार

यापूर्वी केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर पेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किंमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. भाजपचे मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, असेही जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.