ठाणे - कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने घरातच बसून वाट बघणाऱ्या महिलेवर अखेर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला भाईंदर पाडा येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच, रात्रभर घराबाहेर राहणाऱ्या महिलेची मुलगी आणि पती यांची देखील अँटिजेन चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे.
ठाण्यातील विष्णूनगर येथे चाळीत दहा बाय दहाच्या एका कोंडट झोपडीमध्ये हे कुटुंब राहत आहे. येथील महिलेला कोरोना झाला होता. याची माहिती महापलिकेच्या वॉर रूमलाही देण्यात आली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत रूग्णवाहिका आली नाही. घरात लहान मुलगी असल्याने या महिलेच्या पतीने आपल्या लहान मुलीला या विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी घराबाहेर रात्र काढली. त्यानंतर पालिका प्रशासनाने ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल घेत या महिलेला पुढील उपचारासाठी भाईंदर पाडा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
चिमुरडी निगेटिव्ह -
ठाण्यात रूग्णालयात दाखल रूग्णांपेक्षा घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरिबांनी काय करायचे हा सर्वात मोठा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. पालिका प्रशासन देखील मोठ्या कष्टाने काम करत असून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आहे. दरम्यान, या महिलेची प्रकृती सद्या स्थिर असून तिच्या पतीची आणि मुलीची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे मनपा उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सांगितले.