ETV Bharat / state

Thane Crime News: ठाण्याला गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, वाचा, गुन्हेगारीच्या बातम्या एका क्लिकवर

author img

By

Published : Apr 20, 2023, 1:50 PM IST

Thane Crime News
गुन्हेगारी क्षेत्रातील महत्वा्च्या बातम्या

ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या रिटायर पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करून त्यांचा मृतदेह मुरबाड नजीकच्या जंगलातील एका खड्यात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच जिल्ह्यातील मत्स्य पालन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : बांगलादेशातून छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी तरुणांना, नारपोली पोलिसांनी भिवंडी शहरातील दापोडा येथील पारसनाथ कंपाउंडमध्ये सापळा रचून त्यांना अटक केली आहे. मोहम्मद जियाउल हक (२९), अबु सुफियान कबीर शेख (२२), अबू मोसा कबीर शेख (१९), मोहमद अफसर शेख(२६) असे गजाआड करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहेत. गेल्या दोन वर्षात 25 हुन अधिक बांगलादेशी नागरिकांची पोलिसांनी धरपकड केली आहे. हे चारही बांगलादेशी तरुण गेली अनेक वर्षांपासून भिवंडीत वास्तव्यास होते.



तरुणांना न्यायायालयात हजर केले: अटक केलेल्या चारही बांगलादेशी तरुणांकडे भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येवून अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याची प्रथम दर्शनी तपासात आढळून आले आहे. शिवाय अटक बांगलादेशी तरुणाकडे आधारकार्ड, पॅन कार्ड बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, नारपोली पोलिस ठाण्यात पासपोर्ट नियम १९५० चे कलम ३ (अ), ६ (अ) आणि फॉरेनर्स ऍक्ट १९४६ चे कलम १४(अ), अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. चारही अटक बांगलादेशी तरुणांना न्यायायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.

पोलिसाची हत्या करून मृतदेह पुरला खड्यात: उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या रिटायर पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करून, त्यांचा मृतदेह मुरबाड नजीकच्या जंगलातील खड्यात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील देवघर धरण गावा नजीकच्या जंगलात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हत्यासह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. महादू वाळकोळी आणि लक्ष्मण गोटीराम जाधव असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. तर अशोक मोहीते असे हत्या झालेल्या रिटायर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मृतदेह खड्यात पुरला: पोलिसांनी चक्र फिरवत महादू वाळकोळीला मुरबाड तालुक्यातील दुधनोली गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली असता मृतक मोहिते हे त्यांनी उधार दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत असल्याने वाळकोळी याने दुसरा आरोपी लक्ष्मण गोटीराम जाधव याच्या मदतीने मृतक अशोक मोहिते यांना बहाण्याने मुरबाड तालुक्यातील देवघर धरण परिसरात नेवून त्यांची हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह खडयात पुरला होता, अशी कबुली आरोपी महादू याने पोलिसांनी दिली.

प्रेत पुरले असल्याची दिली कबुली: दिलेल्या कबुलीनुसार आरोपीच्या सांगण्याप्रमाणे शोध घेतला असता देवघर धरण परिसरातील झाडाझुडपांमध्ये दलदलीच्या जागेत जमीनीमध्ये पुरुन ठेवलेला अशोक माहिते यांचा मृतदेह मिळून आला. त्यावरुन गुन्ह्यामध्ये कलम १२०ब, ३०२, २०१, ३४ भादंवि या कलमांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महादू वाळकोळी आणि त्याचा साथीदार लक्ष्मण जाधव यांना गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.



मत्स्य पालन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल: राज्य शासनाची बंदी असूनही भिवंडी तालुक्यात वन विभागाच्या जमिनीवर मांगुर माश्यांचे तलावात संवर्धन होत असल्याची खबर मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाली होती. त्याअनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागाने महसूल विभाग आणि पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे ३ अनधिकृत तलावातील ३ टन मांगुर माश्यांचा मत्स्यसाठा जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करून नष्ट केला आहे. तर अनधिकृतपणे मत्स्य संवर्धन करणाऱ्या तिघांन विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलमगीर मंडळ, युनूसअली गाझी, अब्दुल कयुम (तिघेही मूळ रा.पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.



मांगूर मासे पाण्याबाहेर काढून नष्ट करण्याची कारवाई: भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील कुंभारशिव गावात शासनाची बंदी असतानाही अनधिकृतपणे मांगुर माश्यांचा २८ तलावांपैकी ३ तलावात संवर्धन होत असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाली होती. त्याअनुषंगाने त्यांनी ठाणे-पालघर मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश हंसराज पाटील यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे दिनेश पाटील यांनी वरील तिघांना मांगुर माश्यांचे अवैध संवर्धन बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी मत्स्य संवर्धन सुरूच ठेवल्याने दिनेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पडघा विभागाचे मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांसोबत, मत्स्य विभागाचे अमोल ज्ञानेश्वर सोनोने, कृणाली विनोद तांडेल व पडघा पोलीस ठाण्याचे पथक व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मांगूर मासेपाण्याबाहेर काढून एक खड्ड्यात त्यांच्यावर ब्लिचिंग पावडर टाकून ते नष्ट करण्याची कारवाई केली.



यापूर्वीही कारवाई : दरम्यान यापूर्वीही भिवंडी तालुक्यातील राहुर, कुंभारशिव, शिरगाव या परिसरात भूमिहीनांना तसेच वन पट्टे धारकांना दिलेल्या जमिनीवर आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी अनधिकृतपणे तलाव खोदून त्यात बंदी असलेल्या मांगुर माश्यांचे पालन होत असल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणी वन विभागाच्या १५० एकर जमिनीवर १२६ पेक्षा जास्त तलाव आढळून आल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.



पर्यावरणाला अत्यंत घातक: पर्यावरणाला अत्यंत घातक असलेल्या मांगूर जातीचे माशाची प्रजाती नष्ट करण्याचे आदेश केंद्र सरकारने १९ डिसेंबर १९९७ रोजी दिले आहेत. राज्य सरकारने देखील आयुक्त, मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यातील उपआयुक्त मत्स्यव्यवसाय यांना १६ जून २०११ रोजी मांगुर माश्यांच्या प्रजाती नष्ट करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. परंतू या विरोधात २०१८ मध्ये हरित लावादात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचाही निकाल सरकारच्या बाजूने लागला आहे. मांगुर हा माणसाच्या जीवनाला तसेच पर्यावरणाला घातक असणारा मासा आहे.



हेही वाचा: Thane Crime News ठाण्यात ६१२ लाखांचे अमली पदार्थ जप्त दोन नायजेरियनसह रिक्षाचालक गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.