ETV Bharat / state

Farmers Long March : मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन; मात्र, आयोजकांनी सांगितले की, 'आंदोलन सुरू ठेवायचे..

author img

By

Published : Mar 17, 2023, 6:14 PM IST

Updated : Mar 17, 2023, 10:20 PM IST

ठाणे जिल्ह्यात लॉंगमार्च दाखल झाल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांचे पाहुणे असून आमच्या सर्व मागण्या मान्य करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, तरच आम्ही माघारी जाणार अन्यथा सोमवारपासून मुंबईकडे आगेकूच करणार असल्याचा इशारा लॉंगमार्च आयोजक माजी आमदार जे. पी. गावित यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंत केली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडलेले मुद्द्यांची प्रत आम्हाला मिळाल्यानंतर आंदोलन सुरू ठेवायचे की परत जायचे हे आम्ही ठरवू, असे जे पी गावित यांनी सांगितले.

Farmers Long March
शेतकऱ्यांचा लॉंगमार्च भिवंडीत दाखल

लॉंगमार्च आयोजक माजी आमदार जे. पी. गावित माहिती देताना

ठाणे : जिल्ह्यात लॉंगमार्च दाखल झाल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांचे पाहुणे असून आमच्या सर्व मागण्या मान्य करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, तरच आम्ही माघारी जाणार अन्यथा सोमवारपासून मुंबईकडे आगेकूच करणार असल्याचा इशारा लॉंगमार्च आयोजक माजी आमदार जे. पी. गावित यांनी राज्य सरकारला दिला आहे.

आंदोलन मागे घेण्याची विनंती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला, आम्ही त्यांच्याशी बोललो. 14-15 मुद्दे होते आणि त्यातील काहींवर निर्णय घेण्यात आले आहेत. निर्णयांची अंमलबजावणीही केली जाईल. म्हणूनच मी जेपी गावित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मागण्यांसाठी समिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लॉंगमार्च संदर्भात माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करा यासह अन्य मागण्यांसाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती महिनाभरात अहवाल तयार करून सरकारला सादर करेल. या समितीमध्ये संबंधित मंत्री आणि आमदार विनोद निकोले आणि माजी आमदार जेपी गावित यांचा समावेश असेल.

आंदोलनबाबत चर्चा करून ठरवू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेसमोर आपले म्हणणे मांडले, त्याची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नाही. आम्हाला ते मिळाल्यावर ते आमच्या लोकांना दाखवू आणि चर्चा करू, त्यानंतर आंदोलन सुरू ठेवायचे की परत जायचे हे आम्ही ठरवू, लॉंगमार्च आयोजक माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा लॉंगमार्च भिवंडीत : शेतकऱ्यांचा लॉंगमार्च सध्या ठाण्यातील भिवंडी तालुक्याच्या वेशीवर असलेल्या वाशिंदमध्ये काल रात्रीपासून मुक्काम करीत आहे. सरकारला अल्टिमेट म्हणून तीन दिवस याच ठिकाणी लाँगमार्च मध्ये सहभागी असलेल्या हजारो शेतकरी, आदिवासी, भूमिहीन, कष्टकरी यांची तूर्तास पायपीट थांबली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती देताना माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले की, आमच्या लॉंग मार्चचा मुक्काम अजून तीन दिवस वाशिंद या ठिकाणी राहणार आहे. दरम्यान, या तीन दिवसात हजारो मोर्चेकरीकडून वन पट्ट्या बाबतचे फॉर्म भरून घेणार आहोत.

अन्यथा पुन्हा मुंबईकडे : गावित पुढे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हात असून आम्ही त्यांचे पाहुणे आहोत. म्हणून त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. तरच आम्ही मोर्चा माघारी नेऊ अन्यथा सोमवारपासून आम्ही पुन्हा मुंबईकडे आगे कूच करणाऱ्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. शिवाय यापूर्वीही नाशिक ते मुंबई असे दोन लॉग मार्च काढण्यात आले होते. त्यावेळी मात्र त्यावेळच्या राज्य सरकारकडून मिळालेला अनुभव वाईट आला. त्यावेळी केवळ आश्वासन देऊन बोळवण केली होती. त्यामुळे या लाँग मार्च मधील सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी न जाण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार गावित यांनी सांगितले.

लॉंगमार्च स्थगित करण्याची विनंती : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेला शेतकऱ्यांचा लाॅंगमार्चचा आजचा सहावा दिवस असून हा लाॅग मार्च मुंबईच्या दिशेने पुढे चालत असताना काल सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्यांविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉंगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.


सरकार तोडगा काढणार का? : लाँगमार्चमध्ये आपल्या मागण्यासाठी पायी चालणाऱ्या काही शेतकरी आजारी पडले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायी चालणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पायाला सूज येऊन दुखापत झाली असून त्यांच्यावर मलमपट्टी करून उपचार केले जात आहे. मात्र, तीन दिवसाचा मुक्काम वाशिंद मध्ये असल्याने याठिकाणी हजारो मोर्चेकरी थांबल्याने स्थानिक प्रशासनाकडून त्यांना तात्पुरत्या कापडी तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तातडीने अंमलबजावणी करतील का? याकडे लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी, भूमिहीन, कष्टकरी यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : CID Investigate in Threat Case : जितेंद्र आव्हाड कुटुंबियांच्या धमकी प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली 'ही' माहिती

Last Updated :Mar 17, 2023, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.