सोलापूर - पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने शिवतीर्थ येथे ऊस परिषद घेण्यात आली. यावेळी हजारो संख्येने शेतकरी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू झाले असले तरी अद्यापही कोणत्याही साखर कारखाण्याने आपला दर जाहीर केला नाही. तसेच, शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन ऊसाला 3100 चा दर तर, पहिली उचल 2500 रुपये देण्याचा ठराव ऊस परिषदेने केला आहे.
पंढरपूर हे ऊस आंदोलनाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मागील काही वर्षांपासून शेतकरी चळवळीतील संघटनेमध्ये फूट पडली होती. परंतु, शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येत शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा ऊस संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे शिवतीर्थावर भव्य ऊस परिषद घेण्यात आली. यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी पहिली उचल दोन हजार पाचशे रूपये, तर अंतिम भाव ३१०० रूपये द्यावा, अशी मागणीही या परिषदेत करण्यात आली आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज द्यावी. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी, यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत. ऊस परिषदेसाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूट यावर प्रकाश टाकला. त्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनांच्या खर्चाचा विचार करून 2500 रुपये पहिला हप्ता देऊन 3100 रुपये अंतिम दर द्यावा, अन्यथा ऊसाला कोयता लावू देणार नसल्याचा इशारा संघर्ष समितीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या संघर्ष समितीला कोणताही नेता नव्हता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तरुणांनी एकत्रित येत कारखानदारांसमोर आव्हान निर्माण केले आहे. जर कारखानदारांनी मागण्या मान्य केल्या नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखानदार व शेतकरी यांचा संघर्ष अटळ आहे.