ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकीय नेत्यांकडून आठवणींना उजाळा

author img

By

Published : Jul 31, 2021, 4:00 AM IST

Updated : Jul 31, 2021, 8:31 AM IST

Ganapatrao Deshmukh

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले.

सोलापूर - शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

  • गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक - शरद पवार

कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.

हेही वाचा - 'विधानसभेचं विद्यापीठ' : जाणून घ्या, गणपतराव देशमुखांबद्दल...

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

  • साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री

राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

  • लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते - राज्यपाल कोश्यारी

राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली.

हेही वाचा - साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री

साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे.

  • गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : फडणवीस

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते. इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची.

  • महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला - उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली!

गणपतराव आबांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे.

  • आम्ही एक जेष्ठ नेते गमावला - नाना पटोले

साधी राहणीमान, उच्च विचार, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षाच्या निशाणीवर तब्बल अकरावेळा विधानसभेत निवडून येण्याची किमया शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी केली होती. आम्ही एक जेष्ठ नेते गमावला आहे, भावपूर्ण श्रद्धांजली.

  • एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला - अशोक चव्हाण

एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड - सुप्रिया सुळे

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (आबा) यांचे निधन झाले. महाराष्ट्र विधानसभेवर सर्वाधिक काळ निवडून गेलेले कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांचा लौकीक होता. सत्यशोधकी विचारांवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. त्यांचे संपूर्ण आयुष्य कृतीशील विचारांचा वस्तुपाठ आहे.

त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय महत्वाचे व महाराष्ट्राच्या विकासावर सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेतले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.

हेही वाचा - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सांगोल्यात आज होणार अंत्यसंस्कार

  • आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्राची हानी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सांगोला मतदारसंघात 11 वेळा आमदार म्हणून निवडुन आलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. साधी राहणी, उच्च विचार असणारे गणपतराव देशमुख आदर्श मार्गदर्शक नेतृत्त्व होते. विधानसभेत सामान्य माणसांचा गरिबांचा दलितांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा कैवार घेणारे अभ्यासपूर्ण वक्ते मुलूखमैदानी तोफ होते. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. दिवंगत गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

  • एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला - अशोक चव्हाण

राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्त्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

  • महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला - जयंत पाटील

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे, याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.

Last Updated :Jul 31, 2021, 8:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.