सिंधुदुर्ग - भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिकेचे हे व्रत करण्यात येते. रविवारी जिल्ह्यात महिलांनी उत्साहाने हे व्रत करत देवाला साकडे घातले. निर्जळी किंवा न खाता हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा कोकणात आहे. सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते.
हरतालिकेचे व्रत का केले जाते -
'हर' हे भगवान शंकराचे नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते. पार्वतीने आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले. या व्रतासाठी हरतालिका किवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो.
हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे. शास्त्रात या व्रताबाबत 'हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च', अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह, व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे. निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते. पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती.
लग्न झालेल्या महिलांपासून ते कुमारिका देखील दरवर्षी हरतालिकेचे व्रत न चुकता करतात. निर्जळी किंवा न खात हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा कोकणात आहे. सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी खास पूजा केली जाते. खऱ्या अर्थाने हा उपवास आपल्याला हवा तसा किंवा योग्य पती मिळावा या उद्देशाने केला जातो.
या पूजेवेळी महिला श्रृंगार करून उपस्थित असतात. त्यानंतर पार्वतीला सौभाग्य वस्तू अर्पण करून आशिर्वाद घ्यावा अशी परंपरा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांमध्ये हरतालिकेच्या रात्री जागरण केले जाते. मुली आणि महिला एकत्र येऊन फुगड्या घालतात आणि हा उत्सव साजरा करतात. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत वेगळ्या पद्धतीने हरतालिकेचं व्रत केले जाते. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते.