ETV Bharat / state

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचं पाणी नितळ कसे? पर्यावरण तज्ज्ञांनी केला 'हा' खुलासा

author img

By

Published : Aug 16, 2021, 7:53 AM IST

Updated : Aug 16, 2021, 10:15 AM IST

जागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळ

कास तलावाच्या तिन्ही बाजूने असलेला डोंगर हा कातळाचा बनला आहे. पावसाचे पडणारे पाणी या कातळाच्या फटींमधून झिरपून, पाझरून तलावात गोळा होते. पावसाचे अति प्रमाण आणि दगडातून गोळा होणाऱ्या झिरपामुळे उन्हाळ्यात जरी तलावातील पाणी पातळीने तळ गाठला तरी जुलै अखेरपर्यंत तो भरून वाहू लागतो.

सातारा - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले, धरणे आदींमधील पाणी गढूळ झालेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव याला अपवाद ठरला आहे. या तलावातील पाणी नितळ आहे. निसर्गाची देण असलेल्या कास तलावाची भौगोलिक रचना हे यामागील खरे रहस्य आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोत गढूळ झालेले पाहायला मिळतात. तांबड्या रंगाचे पाणी दिसते. हे नेहमीच्या पावसाळ्यातील सर्वसाधारण चित्र असते. मात्र साताऱ्याला पाणीपुरवठा करणारा कास तलाव याला नेहमीच अपवाद राहिला आहे. कास तलावातील पाणी कायम निळेशार, नितळ असतं. काही पर्यावरण तज्ज्ञांच्या माध्यमातून यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे, त्याबाबतचा हा विशेष वृत्तांत..

जागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळ
ग्रॅव्हिटीचा वापर -सह्याद्रीच्या डोंगररांगेत, उरमोडी नदीच्या उगमावर ब्रिटिशांनी 1885 मध्ये एका ठिकाणी भिंत बांधून कास तलावाची निर्मिती केली. साधारणत: बशी सारखी या तलावाची रचना आहे. तलावाच्या तिन्ही बाजूने असलेला डोंगर हा कातळाचा बनला आहे. पावसाचे पडणारे पाणी या कातळाच्या फटींमधून झिरपून, पाझरून तलावात गोळा होते. पावसाचे अति प्रमाण आणि दगडातून गोळा होणाऱ्या झिरपामुळे उन्हाळ्यात जरी तलावातील पाणी पातळीने तळ गाठला तरी जुलै अखेरपर्यंत तो भरून वाहू लागतो. 25 किलोमीटर अंतरात मनुष्यबळाच्या आधारे पाट खोदून नैसर्गिक उताराने हे पाणी सातारा शहराजवळ सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले गेले. कोठेही विजेच्या मोटारीचा वापर करण्यात आलेला नाही, त्यामुळे या तलावाचे पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ राहण्यास मदत होते हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
कासचं पाणी नितळ कसे?
वनस्पतींच्या मुळांमुळे स्वच्छ होते पाणी कास तलावाच्या नितळपणाची कारणमिमांसा करताना यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक राजकुमार चव्हाण म्हणाले, "कास तलावाच्या परिसरात असलेल्या वृक्षसंपदेमध्ये माती पकडून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. त्याचबरोबर कास तलावाच्या कॅचमेंट एरियामध्ये गोळा होणारे पाणी वनस्पतींच्या मुळांमुळे स्वच्छ होऊन तलावात येते. कास परिसरातील जैवविविधता हेच तलावात मिसळणारे पाणी स्वच्छ ठेवण्यास मदत करते. इतर ठिकाणी भूस्खलनामुळे गढूळ पाण्याची अधिक आवक झाल्याचे दिसते.साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले, "कास तलाव परिसरात दाट वनच्छादन आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी झाडांच्या पानांवर पडते. आकाशातून शेकडो फूट उंचीवरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेग झाडाच्या पानांमुळे कमी होतो. या झाडाखाली असलेल्या छोट्या छोट्या झुडपांवर, नंतर ते गवतावर पडते. इथल्या निसर्गाने ही रचना केलेली असल्याने जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड कमी होतो. त्यामुळेच कास परिसरात मातीची धूप होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. डोंगरदऱ्यांमध्ये कशा पद्धतीने वनराई असली पाहिजे याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. परदेशी वृक्ष स्वतःच्या सावलीत इतर झाडे येऊ देत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक प्रजाती लावल्या, जपल्या पाहिजेत. तरच अतिवृष्टीमुळे होणारे भूस्खलन व त्यातून होणाऱ्या हानीची परिणामकारकता आपण कमी करू शकू, असे मतही सुनील भोईटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
Last Updated :Aug 16, 2021, 10:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.