ETV Bharat / state

साताऱ्यात भाजपाचाच उमेदवार लढणार, अजित पवारांना थेट आव्हान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 10:51 PM IST

MLA Jayakumar Gore
MLA Jayakumar Gore

Ajit Pawar : सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत दावे प्रति दावे सुरू आहेत. अजित पवारांनी सातारा लोकसभा उमेदवारीवर दावा केल्यानंतर त्याला भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी आज प्रति आव्हान दिलंय.

जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद

सातारा Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर दावा केल्यानंतर आता भाजपा देखील आक्रमक झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा आहे, आम्हीच साताऱ्यातून लढणार असल्याचा दावा भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यामुळं सातारा मतदार संघाच्या उमेदवारीवरून महायुतीत चांगलीच जुंपली आहे.

अजित पवारांना साताऱ्यातूनच आव्हान : सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्यानंतर सातारा भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. तसंच साताऱ्याची जागा अजित पवार गटाला मिळणार की भाजपाकडं राहणार, यावरून सध्या रणकंदन सुरू झालं आहे. अजित पवारांच्या दाव्यानंतर साताऱ्यातील भाजपा आमदार जयकुमार गोरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सातारा लोकसभा मतदार संघावर दावा करत थेट अजितदादांनाच आव्हान दिलं आहे.


कोणत्याही परिस्थितीत मतदार संघ सोडणार नाही : यावेळी भाजपा आमदार गोरे म्हणाले की, भाजपा हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळं कोणी काहीही भूमिका मांडत असलं, तरी हा मतदासंघ कोणत्याही किंमतीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे‌, ही आमची भूमिका आहे. आम्ही तसं पक्ष श्रेष्ठींना कळवलं आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपा हा मतदारसंघ सोडणार नाही , असं आमदार गोरे यांनी अजित पवारांच्या दाव्यानंतर ठणकावून सांगितलंय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक : एकीकडं सातारा लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत रणकंदन पाहायला मिळत असताना साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक राष्ट्रवादी भवनात झाली. महायुतीच्या विरोधात जन आंदोलन उभं करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला. गावापासून ते शहरापर्यंत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू करून जनसंपर्क वाढवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे, दीपक पवार, श्रमुदचे डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकेरे (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते उपस्थित होते.

महायुती सरकारकडून फसवणूक : यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, महायुती सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा केवळ निधी जाहीर करून प्रत्यक्षात, जनतेची फसवणूक केली जात आहे. या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनआंदाेलन उभारणार आहोत. पुनर्वसन, सिंचनाचे प्रश्न गंभीर असताना सरकार आंदोलनकर्त्यांची हाक ऐकायला तयार नाही. अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात व्यापक चळवळ उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला असल्याची माहिती डॉ. भारत पाटणकरांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.