सांगली - चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (गुरूवार) सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी तीन वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून 4 हजार 883 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून 1 हजार 125 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून 6 हजार 8 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
24 तासात पाणीपातळीत दोन मीटरने वाढ -
धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे गेल्या 24 तासात धरणाची पाणीपातळी दोन मीटरने वाढली आहे. मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर मोठा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय पिकांचे नुकसान होईल या भितीमध्ये शेतकरी आहे.
सतर्कतेचा इशारा -
धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजता चांदोली धरणाची पाणी पातळी 622.15 मीटर इतकी आहे. धरणात 29.61 टीएमसी पाणीसाठा असून धरण 82.57 टक्के भरले आहे. आज अखेर 1093 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे.