ETV Bharat / state

Anant Geete : '‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा'; अनंत गितेंनी घेतला बंडखोर सामंतांचा समाचार

author img

By

Published : Jul 23, 2022, 9:23 PM IST

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मातोश्री स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अनंत गिते यांनी उदय सामंतांवर जोरदार टीका ( Anant Geete criticized rebel MLA Uday Samant ) केली आहे.

Anant Geete criticized rebel MLA Uday Samant
अनंत गितेंनी घेतला बंडखोर सामंतांचा समाचार

रत्नागिरी - सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी एक भाकीत केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार येणार नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल आणि त्यानंतर कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील, हे माझे भाकीत आहे, असे अनंत गीते यांनी आज रत्नागिरीत म्हटले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपली आहे. एका ‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा आहे. असे सांगून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने हेच भविष्यातील विधानसभा उमेदवार असल्याचे शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जाहीर केले. ( Anant Geete criticized rebel MLA Uday Samant )

अनंत गितेंनी घेतला बंडखोर सामंतांचा समाचार

कृतज्ञता सोहळ्यात गरजले - माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मातोश्री स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गीते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, जि.प.चे माजी उपाध्यक्ष, कडवट शिवसैनिक यशवंत कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेना तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्याला 'आई'ला वाचवायचं - ‘मातोश्री' ही राजकारणातील प्रत्येक शिवसैनिकाची आई आहे. आज आपली आई अडचणीत असताना सर्व शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे. जे कृतघ्न होते ते तोंड काळे करून निघून गेले. आता या गद्दारांना माफी नाही. शिवसैनिकच त्यांना टकमक टोक दाखविल्याशिवाय शांत बसणार नाहीत. गद्दारांमध्ये आपला पण एक गद्दार निघाला. कोकणातील पाचही गद्दारांना घरी बसविल्याशिवाय शिवसैनिकांनी शांत बसायचे नाही. आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपली आहे. एका ‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा आहे. असे सांगून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने हेच भविष्यातील उमेदवार असल्याचे शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जाहीर केले. त्यावेळी वि.दा.सावरकर नाट्यगृहात बने हितचिंतक, शिवसैनिकांनी टाळ्यांच्या गजरात गीते यांच्या घोषणेचे स्वागत केले.

उदय बनेंचे केले कौतुक - वयाच्या 61व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल अनंत गीते यांनी उदय बने यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्या राजकारणातील प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले. त्यानंतर शिवसेनेत राहून स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या शिंदे गटाचा गीते यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आज समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उदय बने यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. असा हा कडवट शिवसैनिक एका बाजुला तर कृतघ्न होऊन तोंड काळे करून गेलेलेही या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने पाहिले आहे. ‘ तो मी नव्हेच' या नाटकात एकच लखोबा लोखंडे होता. परंतु शिंदेंच्या गटात अनेक लखोबा आहेत. त्यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघातील एक लखोबा निघाला हे दुर्दैवी आहे. परंतु शिवसेनेने या मतदारसंघासाठी आजच दुसरा ‘उदय' दिल्याचे गीते यांनी जाहीर केले.

'शिवसैनिक टकमक टोक दाखवतील' - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. गद्दारांनी भाजपाला हाताशी धरून पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. खाली खेचणारेच आम्ही आजही शिवसैनिक आहोत असे सांगत आहेत. पक्षप्रमुखाला खाली खेचणारा शिवसैनिक होऊ शकतो का? असा प्रश्न गीते यांनी उपस्थितांना विचारताच सभागृहातून ‘नाही' म्हणत प्रतिसाद मिळाला. ज्यांनी गद्दारी केली, स्वतःची कातडी वाचविण्यासाठी भाजपला जाऊन मिळाले ते, आम्ही परत शिवसेनेत येऊ असे सांगत आहेत. त्यांचे आता वेगळ्या स्टाईलनेच स्वागत केले जाईल. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांचा कडेलोट झाला असता. परंतु शिवसैनिक, मतदारच यांना टकमक टोक दाखवतील असा इशारा गीते यांनी दिला.

उदय बने यांनी व्यक्त केली कृतज्ञता - कृतज्ञता सोहळ्यात उदय बनेंच्या मातोश्री प्रमिला विनायक बने यांचे साठ दिव्यांनी ओवाळून औंक्षण करण्यात आले. त्यानंतर उदय बने यांनी व्यासपीठावरून लोटांगण घालत कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी आपण अनेक अपघात, संकटातून सहीसलामत बाहेर पडत आजही भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक, मतदारांनी, जुन्या सहकारी मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळेच आपण खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या आशिर्वादामुळेच आपल्याला लढण्याचे बळ मिळाले असल्याचे बने यांनी सांगितले.

हेही वाचा - CM Eknath Shinde On Maha Tour : ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदे देणार टक्कर; लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.